कोल्हापूर : संघ स्वयंसेवकांवरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भाजप आमने-सामने आली आहे. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघ स्वयंसेवकांवरुन काल (12 जुलै) एक वक्तव्य केलं होतं.


राजू शेट्टी म्हणाले, मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत कोरोनाचा हाहाकार सुरू होता, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्य करत असल्याचं एकही बातमी आली नाही. मात्र, जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले. यांच्या दाव्याप्रमाणे धारावीत संघ स्वयंसेवकांनी काम केले असेल तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही.


काय होतं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना विरुद्ध काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग केले आहे. त्यामुळे केवळ सरकारने याचं श्रेय घेऊ नये, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.


धारावी कोरोनामुक्तीचं सर्व श्रेय सरकारचं नाही, संघ स्वयंसेवकांचंही : चंद्रकांत पाटील


ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे. मात्र, ज्या चुकीच्या आहेत त्यावर टीका करायची नाही का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. कोरोना विरुद्ध काम करत असताना या सरकारने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. विधानसभेमध्ये या सगळ्याची मांडणी करणार असून तूर्तास मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.


WHO कडून धारावी पॅटर्नचं कौतुक


आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांचं कौतुक केलं. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त 166 आहे.


Dharavi Corona | धारावीनं कोरोनाची साखळी तोडली, जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक | स्पेशल रिपोर्ट