कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे नॉन मराठी असल्यामुळे कदाचित त्यांना डोळे पांढरे होणे आणि डोळे विस्फारने या मधला फरक समजला नसेल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी राज्य सरकारचे कोरोना विरुद्धचे काम बघून फडणवीस यांचे डोळे पांढरे होतील, असं वक्तव्य केलं होतं. मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना विरुद्ध काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग केले आहे. त्यामुळे केवळ सरकारने याचं श्रेय घेऊ नये, असंही चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये म्हटलं आहे.


ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे मात्र ज्या चुकीच्या आहेत त्यावर टीका करायची नाही का? असा सवाल देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. कोरोना विरुद्ध काम करत असताना या सरकारने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. विधानसभेमध्ये या सगळ्याची मांडणी करणार असून तूर्तास मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणालेत.

केंद्र सरकारने चौदाव्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतींना पैसे दिले होते. त्या पैशाचे व्याज राज्य सरकार कसे काय वापरू शकते? हे पैसे राज्य सरकारने घेता कामा नये. ते ग्रामपंचायतींना परत करावे असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यातील 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या या केवळ कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी केल्या असल्याची टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. मात्र शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर बोलण्यास दादांनी नकार दिला. असून तिसरा टप्पा झाल्यानंतर सविस्तर बोलणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मुश्रीफ नेमकं काय म्हणाले होते?

मुश्रीफ म्हणाले होते की, जगाला उदाहरण देता येईल अशा पद्धतीने मुंबईत कोरोना विरुद्ध काम झाले आहे. मी ज्यावेळी मुंबईतील यंत्रणा पाहिली त्यावेळी माझे डोळे पांढरे झाले. फडणवीस तुम्ही देखील मुंबईतील व्यवस्था बघा म्हणजे तुमचे डोळे देखील पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईत मुख्यमंत्री घरात बसून काय करतात असे विचारणाऱ्यांनी हे काम पहावं असे देखील मुश्रीफ म्हणाले होते.