Gulab cyclone update: गुलाब चक्रीवादळाची लॅंडफॉलची प्रक्रिया रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पूर्ण झाली आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 82 किमी कायम असल्याची माहिती आहे.  दरम्यान काही तासात चक्रीवादळ तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. त्यानंतर वाऱ्यांचा वेग कमी होणार असल्याची माहिती आहे. 


यामुळं आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आजसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 



परतीचा पाऊस धुवून काढणार असा इशारा भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिला आहे. याचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्रात दिसणार आहे. काल रविवारी नांदेड जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसले. यावरून परतीचा पाऊस झोडपणारच अशी चिन्हे दिसत आहेत. नदी काठी राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 
                        
वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रवाट वावटळ तयार होणार आहे. बंगालच्या खाडीत सुध्दा कमी प्रभावाचे क्षेत्र तयार झाले आहे. चक्रवाट वावटळ ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटांवर धडक मारणार आहे. याचा प्रभाव मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दिसणार आहे. अत्यंत जास्त वेगाने वारे वाहणार आहेत. हा प्रभाव 27 आणि 28 सप्टेंबर रोजी जास्त प्रमाणात दिसणार आहेत. यासाठी समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन  हवामान विभागाकडून करण्यात आलंय.


उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज! अकोल्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, हिंगोलीची कयाधू नदीही फुल..


 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.