मुंबई : राज्यातील वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयाशी संबंधित फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी आता 'वंदे मातरम' (Vande Mataram) या शब्दाचा वापर करावा असं आवाहन राज्याच्या वन मंत्रालयाने केलं आहे. वंदे मातरम म्हणणं हे ऐच्छिक असल्याचंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. या आधीही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungatiwar) यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा केली होती. 


राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "वनविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संवादादरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे."


महसूल आणि वन विभागाने काढलेले परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाचा संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलीच घोषणा यासंबंधी केली होती. 


काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार? 


काही दिवसांपूर्वी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी फोन संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'नं करण्याचं अभियान राबवणार, असं जाहीर केलं. नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली आणि चर्चांना उधाण आलं आहे. सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलण्याचा आदेशामुळे वाद रंगला. रझा अकादमीनं या आदेशाला विरोध दर्शवला आहे. आमच्याकडे फक्त अल्लाहची पूजा केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना जो शब्द मान्य असेल असा शब्द द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने करत या निर्णयाला विरोध केला होता. तर राज्याच्या राजकारणातूनही अनेक मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.


वंदे मातरम् आणि वाद 


वंदे मातरम् या घोषणेचा किंवा वाक्याचा वाद हा पहिल्यांदाच निर्माण झालेला नाही तर याआधी सुद्धा भाजप आमदार आणि एमआयएमच्या आमदारांचा वाद अधिवेशनात जगजाहीर आहे. "इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा," असं म्हणत भाजप आमदारांनी अनेकदा अधिवेशन काळात सभागृह बंद पाडलेलं पाहायला मिळत होतं. त्यामुळे वंदे मातरम् वरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होताना पाहायला मिळत आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत सोबत असलेल्या शिंदे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री वंदे मातरम् म्हणणार की शिवसेनेच्या परंपरेनुसार जय महाराष्ट्र म्हणणार हेही पाहण तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: