भाईंदर : हिरे म्हटलंकी कोणाचेही डोळे चमकतात आणि अशाच खऱ्या हिऱ्यांची बॅग जर रिक्षामध्ये विसरली तर... लाखो किंमतीचे असेच हिरे भाईंदर पोलीस स्टेशनच्या (Bhayandar Police Station) हद्दीत एका हिरे व्यापाऱ्याकडून रिक्षातच विसरले होते. पण भाईंदर पोलिसांनी अवघ्या सात तासांत सीसीटीव्हीच्या मदतीने रिक्षाचा शोध लावून, व्यापाऱ्याला त्याचे हिरे परत मिळवून दिले आहेत. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने एक कॅमेरा शहरासाठी हा उपक्रम राबवल्यामुळेच ही हिऱ्याची बॅग परत मिळाली आहे. 


कांदिवली येथे राहणारे हिरे व्यापारी राहुल लुनावत यांनी कांदिवली येथून भाईंदरच्या दिशेने रिक्षा पकडली आणि त्या रिक्षातच तो पाच लाखांचे हिरे आणि महत्त्वपूर्ण कागदपञे विसरला. त्यांने लगेच भाईंदर पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी राहुल सोबत घटनास्थळाला भेट देत शहरातील सहा ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले. त्यात अखेर रिक्षाचा नंबर मिळाला. रिक्षा कोणत्या दिशेने गेली आहे त्याची माहिती देखील मिळाली. मग ती बॅग इतर कोणाच्या हाताला लागण्याच्या आधी अवघ्या सात तासांत, भाईंदर पोलिसांनी ती रिक्षा शोधून काढली. सुदैवाने ती हिऱ्यांची बॅगदेखील त्या रिक्षातही मिळून आली. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने शहरातील नागरिकांना आवाहन केलं होतं की एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावावा. त्याच बरोबर रस्त्यावरही पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्याचाच फायदा आता पोलिसांना या हिऱ्यांच्या बॅगच्या तपासावेळी झाला आहे.  


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha