जळगाव : आजवर आपण अनेक प्रकारच्या आगीच्या घटना पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. मात्र विहीर पेटल्याची घटना तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि ऐकलीही नसेल. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका पुरातन ऐतिहासिक पाय विहिरीला आग लागल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली.


या घटनेने यावलमध्ये खळबळ उडाली. आगीने रौद्र रूप धारण केल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या बंबांच्या सहाय्याने विहिरीला लागलेली ही आग आटोक्यात आणली.


आग विझवली असली तरी या विहिरीच्या आगीविषयी चर्चा यावल शहरासह जळगाव जिल्ह्यात होताना दिसत आहे. यावल शहरातील बसस्थानक परिसराच्या जवळ प्राचीन काळापासून ही पाय विहीर आहे.

पूर्वी याच विहिरीच्या पाण्याचा वापर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करीत होते. बदलत्या काळात पाणी योजना आल्याने विहिरीवरून पाणी भरणे बंद झाले आणि या विहिरीचा वापर नागरिक अगदी कचराकुंडीसारखा करू लागले.

प्रशासन आणि नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अर्ध्याहून अधिक विहीर कचऱ्याने भरली आहे.  हा कचरा जाळण्यासाठी कुणीतरी आग लावल्याचा संशय आहे. मात्र काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग परिसरात पसरण्याची लक्षणे दिसू लागतात नागरिकांनी अग्निशमन दलाची मदत घेत या विहिरीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.