मुंबई : नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. नाणारसंदर्भात आपण ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घेतल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. तसंच भविष्यात प्रत्येक ट्वीटला मुख्यमंत्री असाच प्रतिसाद देतील, असा उपरोधिक टोलाही नितेश राणेंनी लगावला. शिवसेनेचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाणीवपूर्वक हे गुन्हे लावले होते, असा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (2 डिसेंबर) नाणार इथल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. नाणार इथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होता. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडलं होतं. नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मु्ंबईत विधानभवनातून थेट दिल्लीपर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.

त्याआधी मुख्यमंत्र्यांनी आरे इथल्या कारशेडला विरोध करत जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलक पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेतले. त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाणारवासियांना दिलासा दिला.


संबंधित बातम्या

CM Thackeray Nanar | आरेनंतर नाणार आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश | ABP Majha