मुंबई : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी राज्यासह देशभरात आज अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.  शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असलेले कायदे जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत आत्महत्याचे सत्र थांबणार नाही. जगाच्या पोशिंद्याची होत असलेली वाताहत निगरगट्ट प्रशासन व असंवेदनशील राजकीय पक्षापर्यंत पोहोचावी यासाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केला जात आहे. या आंदोलनात किसानपुत्रांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करुन ते धोरण राबविले जाते. सरकारे बदलली पण धोरण बदलले नाहीत. त्याच कायद्यांमध्ये शेतकरी अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन गेल्या काही वर्षांपासून 19 मार्च रोजी सातत्याने हे अन्नत्याग आंदोलन करत आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी दिली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी या उपवासाचे 'सांगता समारंभ' आयोजित केले जात आहेत.  जमेल तसा, जमेल तेथे अन्नत्याग करा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करत या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अमर हबीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रती सहवेदना
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. ती महाराष्ट्रातील पहिली सहकुटुंब आत्महत्या  मानली जाते. या घटनेपासुन अव्याहतपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठीया अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी केले आहे