Chhatrapati Sambhaji Nagar News : काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 पेक्षा अधिक लोकांनी जीव गमावला होता. या घटनेनंतर राज्यात जोपर्यंत उष्णतेची लाट आणि कडाक्याचं ऊन आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत मोकळ्या जागेवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे निर्देश पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. मात्र असे असताना आज पैठणमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या उपस्थितीत आज भर उन्हात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे आयोजकांनी छोटासा मंडप टाकल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना सावलीसाठी बाजूला असलेल्या झाडांचा आसरा घ्यावा लागला. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 


शिंदे गटाचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील विकासकामाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुमरे यांच्यासह कृषी आयुक्त सुनील चव्हाण देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाचे आयोजन चक्क भर उन्हाच्या वेळी करण्यात आले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरवात झाली.पण कार्यक्रमाच्या ठिकाणी समोर टाकेलेल्या मंडपात प्रचंड उकाडा जाणवत होता. तर सुरवातीला खुर्च्या देखील कमी होत्या. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी बाजूला असलेल्या झाडाखाली खुर्च्या टाकून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एवढ्या भर उन्हात कार्यक्रम आयोजित करण्याची गरज होती का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. 


भुमरे संतापले...


संदिपान भुमरे स्टेजवर आल्यावर अनेकजण त्यांना झाडाखाली बसल्याचे दिसून आले. तर मंडपात लोकांना बसण्यासाठी खुर्च्या देखील कमी असल्याचे दिसत होते. त्यामुळे भुमरे यांचा पारा चढला. त्यांनी स्टेजवरच आयोजकांना खडेबोल सुनावले. एवढच नाही तर स्वागतासाठी दिलेली शाल त्यांनी टाकून देत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तत्काळ खुर्च्या मागवण्यात आल्यात. पण यावेळी भुमरे यांचा संताप पाहून, कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. 


एवढ्या उन्हात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची खरच गरज आहे का?


काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यात जोपर्यंत उष्णतेची लाट आणि कडाक्याचं ऊन आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत मोकळ्या जागेवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे निर्देश पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. मात्र असे असताना खुद्द मंत्रीच असे कार्यक्रम आयोजित करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे एवढ्या उन्हात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची खरच गरज आहे का? असेही प्रश्न विचारला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Heatstroke Deaths: आता दुपारी मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग