नवी मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यासोबत ज्यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत, त्यांना क्वॉरंन्टाईन करण्यात आल्याने अशा व्यक्तींकडेही विशेष लक्ष देण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी अँटी कोव्हिड- 19 आर्मीची स्थापना केली आहे.


नवी मुंबईतही अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण आला आहे. डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय आणि इतर अधिकारी यांच्यावर कामांचा ताण पडत आहे. वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडू नये यासाठी मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी अॅंटी कोव्हीड - 19 आर्मीची स्थापना केली.


नवी मुंबई शहरात असलेल्या सुपर स्पेशॅलिटी डॉक्टर्स, जनरल प्रॅक्टिशनर्स, पॅरामेडिकल स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांना या कोरोना विरोधातील लढ्यात सामील होण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून वॉलंटरी बेसिसवर काम करण्यासाठी अनेक जण पुढे येवू लागले आहेत.


कोरोना विरोधी आर्मीत सहभागी होत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना वेगवेगळी जबाबदारी सध्या वाटून दिली जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पेशंट वाढल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी अॅंटी कोव्हीड - 19 आर्मी तयार ठेवण्यात आली.


कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार


कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कैक पटीने वाढत असतानाही नागरिक भाजीपाला, किराणाच्या नावाखाली घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करत आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी आता अधिक कठोर पावलं उचलण्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.


इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, या सगळ्यांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं.