मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कैक पटीने वाढत असतानाही नागरिक भाजीपाला, किराणाच्या नावाखाली घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करत आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी आता अधिक कठोर पावलं उचलण्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.


इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, या सगळ्यांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं.


"बेजबाबदारपणाने वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही," असं अजित पवार म्हणाले.


'अन्यथा कठोर उपाय करावे लागतील'
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय करावे लागतील, असंही पवार म्हणाले.


कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या यंत्रणांचे आभार
अजित पवार म्हणाले की, "कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानतो.


India Lockdown | Ajit Pawar | डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार : अजित पवार