Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्येच (Loksabha Election 2024) निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नोटीस आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यापासून निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटीशीवर जोरदार बोलण्याची शक्यता आहे. मशाल गीतामध्ये भवानी शब्द आल्याने निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना नोटीस आल्याचे समजते. विरोधकांची अनेक उदाहरणे देऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. 


भाजपच्या टीकेवर काय बोलणार?


दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला होता. या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांनी आदित्य यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीसाठी निघणार असल्याचे सांगितले होते, असा दावा केला आहे. यानंतर भाजप नेत्यांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. भाजप नेत्यांनी चौफेवर हल्ला उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला आहे. त्यामुळे या वादावरही उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सुद्धा लक्ष आहे. 


शिंदे गटाकडून थेट मिलिंद नार्वेकरांना विचारणा 


दुसरीकडे, दक्षिण मुंबई जागेवरून शिंदे गटाकडून थेट मिलिंद नार्वेकर यांनाच विचारणा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेले आणि अत्यंत विश्वासार्ह समजले जातात तेच नार्वेकर आता ठाकरेंची साथ सोडणार का? याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवरून सूचक विधान केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट नार्वेकरांकडे चाचपणी करत आहे. नार्वेकरांचे शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी सुद्धा घनिष्ठ संबंध आहेत. मुंबई दक्षिणमध्ये परळपासून भायखळ्यापर्यंत शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला आहे, तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेला पाठिंबा आहे. पक्ष विभाजनानंतर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघांतर्गत येणाऱ्या अंधेरी पूर्व मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने विजय मिळवला होता. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे दोन दशकांपासून जवळचे सहकारी आहेत. त्यांनी सेनेच्या कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले आहे, पक्ष संघटनेतील विविध कामे हाताळली आहेत.


2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप नार्वेकरांवर केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री शिंदे नार्वेकर यांच्या निवासस्थानी गेल्याने सेनेतीलच भुवया उंचावल्या होत्या. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश करणार अशी अटकळ असतानाही नार्वेकर ठाकरे गटाशीच राहिले. तथापि, पुन्हा अफवा उफाळल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या