रत्नागिरी : शिमगा! प्रत्येक कोकणी माणसाचा आपला, स्वत:चा असा सण. याच काळात ग्रामदेवता भक्ताच्या, भाविकाच्या घरी भेटीला येते. त्यामुळे होणारा आनंद हा गगनात मावेनासा होतो. वर्षभर 'चकोरा'प्रमाणे कोकणी माणूस याच दिवसाची जणू वाट पाहत असतो. भक्ती-भाव, देवाच्या भेटीची ओढ, वर्षानुवर्षे देवाशी घट्ट असलेली विण या गोष्टी कोकणी माणूस पिढ्यानपिढ्या जपत आलाय. आपल्या रूढी-परंपरा जपण्यात त्यानं कायम धन्यता मानलीय. देवाच्या सेवेत, देवाच्या उत्सवात खंड पडणार नाही याची काळजी त्यानं कायमच घेतली आहे. 


शिमगोत्सव म्हणजे कोकणची ओळख. चाकरीनिमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेला, अगदी साता समुद्रापार गेलेला कोकणी माणूस शिमगोत्सवाकरता आपल्या मुळगावी हमखास येतो. ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीमय वातावरण ही झाली शिमगोत्सवाची ओळख आणि एक बाजू. पण, त्याचवेळी शिमगोत्सवाची दुसरी बाजू आणि केव्हाही चर्चेत नसलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गणितं. शिमगोत्सवाच्या काळात कोकणात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याचा प्रत्येक कोकणी माणसाशी, कष्टकरी वर्गाशी मोठा आणि जवळचा संबंध असतो. पण, यंदाच्या निर्बंधांमुळे या साऱ्या बाबींना एक लगाम लागला आहे. त्यामुळे ऐकायला काहीशी कठिण असलेली आर्थिक बाजू महत्त्वाची ठरते. 


कशी होते आर्थिक उलाढाल?
चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेली कोकणच्या आर्थिक व्यवस्थेत आता मोठे बदल झालेत. स्थानिक बाजारपेठ आणि नवनवीन व्यापार उदीमांना सध्या कोकणात सुगीचे दिवस आलेत. असो. पण, शिमगोत्सवात कोकणात खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असते. देवाच्या दानपेटीपासून ते अगदी स्थानिक बाजारपेठ आणि कष्टकरी वर्गाचं यावर एक मोठं आर्थिक गणित अवलंबून असते. याची मुळात सुरूवात होते ती चाकरमान्यांच्या येण्यानं. देवाच्या भेटीकरता चाकरमानी गावी येतो. त्याकरता कार, खासगी, बस आणि रेल्वेचा वापर होत असल्यानं यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला एक व्यापार मिळत असतो. यावेळी रिक्षा, स्थानिक वडाप यासारख्यांच्या धंद्याला बरकत मिळत असते. खासगी बसचा सिझन याच काळापासून सुरू होतो आणि जूनच्या मध्यापर्यंत सुरळीत सुरू असतो. चाकरमानी गावी आल्यानंतर आपल्या नातेवाईकांनी भेटायला जाण्याकरता अनेकवेळा स्थानिक गाडी आणि गाडी चालकांची मदत होते. यावर हे सारं अवलंबून आहे. यावेळी गावाजवळची बाजारपेठ असो किंवा गावातील अगदी छोटे दुकान यामध्ये होणारी खरेदी आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.



कोकणात ठराविक अंतरानंतर किंवा गावानुरूप रूढी-परंपरा बदलताना दिसून येतात. पण, असं असलं तरी देवाच्या दानपेटीत दान सोडताना कोकणी एक माणूस केव्हाच हात आखडता घेत नाही. देव घरी येणार म्हणून होणारा आनंद काय वर्णावा! देवाची पालखी घरी येणार म्हटल्यावर पालखी सोबत भोई, खेळे, वाजंत्री, गुरव, गावातील मानकरी यांना हौसेनं पोस्तं देण्याची पद्धत देखील अनेक भागांमध्ये दिसून येते. यावेळी खेळे, वाजंत्री, देवाचे निशाणा यांना स्वखुशीनं पैसे (पोस्तं) दिलं जातं. कधीकाळी 5 किंवा 10 रूपये असणारी रक्कम आता काळानुरूप वाढली आहे. देवाच्या दानपेटीत त्याला तळी असं म्हटलं जातं. या तळीत देखील स्वखुशीनं रक्कम दिली जाते. त्यावर देवाचा वर्षभराचा खर्च अवलंबून असतो. अशा या साऱ्यामधून गाव आणि गावची लोकसंख्या पाहता किमान लाखाची उलाढाल तरी नक्कीच होते. तसेच शिंपणं आणि पॉस यासारख्या प्रथांवेळी देखील होणारा खर्च हा दुर्लक्षित करून चालणार नाही. अशा रितीनं गावातील गावात पालखी भेटीवेळी होणारी उलाढाल ही यंदाच्या निर्बंधांमुळे ठप्प झाली आहे. 


व्यापार-उदीमांवर कशारीतीनं परिणाम होतो?
या साऱ्या गोष्टी गाव आणि वाडीपुरत्या मर्यादित झाल्या. पण, बाजारपेठांच्या उलाढालीमध्ये कशीरीतीनं फरक पडतो याबाबत आम्ही रत्नागिरीतील व्यापारी असलेल्या गौरांग आगाशे यांच्याशी संपर्क साधला. गौरांग तरूण आहे. शिवाय, त्यांच्या तीन पिढ्या सध्या जीवनावश्यक वस्तुंच्या व्यापारामध्ये आहेत. यावेळी 'यंदाच्या निर्बंधांमुळे कोकणातील व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे. याच काळात कोकणातील व्यापाराला मोठी चालना मिळत असते. स्थानिक बाजारपेठेसह राज्याच्या इतर बाजापेठांमधून देखील मोठ्या प्रमाणार माल आणला जातो. त्यावर एखदा मजूर वर्ग असेल किंवा छोटे-मोठे दुकानदार, काही एजन्सीवाले यांच्या मार्फत मोठी उलाढाल होत असते. अनेकांना याकाळात दोन पैसे नक्कीच जास्त पैसे मिळतात. देवाच्या ओटीकरता लागणारे नारळ, कापड असोत किंवा जीवनावश्यक वस्तुंची मोठी खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात स्थानिक दुकानदार किंवा मोठे व्यापारी यांचा विचार केल्यास नक्कीच आकडा कोट्यवधींमध्ये जाईल' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


शिवाय आम्ही संतोष आंबेकर यांच्याशी देखील संपर्क साधला. आंबेकर यांच्या घरात गावातील गावकाराचा मान आहे. रत्नागिरीपासून जवळच असलेले फणसवळे हे त्यांचं गाव. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी 'कोकणी माणसाचं देवाशी असलेलं नातं ही बाब तर आहेच. पण, येणारा चाकरमानी इथं पैसा खर्च करतो. त्यातून स्थानिक दुकानदाराला देखील दोन पैसे नक्कीच मिळत असतात. देव घरात आल्यानंतर खेळे, गुरव, वाजंत्री, गुरव यांना पोस्तं दिलं जातं. मग ती रक्कम कितीही असो ती स्वखुशीनं असते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही' अशी प्रतिक्रिया दिली. याच गावातील हरी माने मागील अनेक वर्षे पालखीसोबत खेळे म्हणून जातात. 'यावेळी पोस्तं देण्याची प्रथा आहे. ती आम्हा खेळ्यांना देखील मिळते. मी गावीच असतो. या शिमगोत्सवाच्या काळात खेळे म्हणून असलेला प्रत्येकजण दोन पैसे कमवतो. त्याप्रमाणे ते मला देखील मिळतात. याच आधारे मी पुढील किमान दोन महिन्याचं तरी नियोजन करतो. असे अनेकजण तुम्हाला कोकणात भेटतील' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


त्याचवेळी आम्ही खेळण्याचा व्यवसाय करणाऱ्या राजेश जाधव यांच्याशी संपर्क साधला. राजेश जाधव हे शिमगोत्सवाच्या काळात रत्नागिरी तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात खेळण्याचं दुकान लावतात. 'मी मागील पाच ते सहा वर्षापासून शिमगोत्सवात खेळण्याचं दुकानं लावतो. मला चांगले पैसे यामुळे मिळतात. मुंबई, कोल्हापूर या ठिकाणीहून मी खेळणी आणतो आणि इथं विकतो. पण, यंदाच्या निर्बंधांमुळे मला मोठा फटका बसणार आहे. एवढंच नाही तर यावेळी कोण वडापाव, कोण चहाचं तर कोण अगदी कलिंगड देखील विकत असतं. त्यांना देखील यंदा मोठा बसणार असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


दरम्यान, या साऱ्यामध्ये शेवंती आंबेकर या वयाची पासष्ठी ओलांडलेल्या आजींची प्रतिक्रिया खूपच बोलकी आणि मनाला भिडणारी होती. शेवंती यांना तिन मुली. दोघींचं लग्न झालंय. 'शिमगोत्सवाच्या काळात माझ्या लेकी, जावई आणि नातवंड माझ्या घरी दोन दिवस का असेना येऊन वस्ती करतात. त्यामुळे माझ्या घराचं गोकुळ होतं. शिवाय, देव घरी येणार म्हणून जय्यत तयारी करतो. कना-रांगोळी घातली जाते. पण, यंदा या साऱ्याला आम्ही मुकणार. देव घरी येणार नाही ही कल्पनाच करवत नाही' असं सांगताना आजींच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. त्यामुळे कोकणी माणूस, शिमगा आणि ग्रामदेवचा यांचं नातं किती घट्ट असेल याचा तुम्हाला अंदाज एव्हाना नक्की आला असेल!