मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ पुरस्कृत आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने 14 वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन 23, 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, संशोधक, साहित्य इतिहासकर डॉ. महेंद्र भवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.


संमेलनाध्यक्षपदी योग्य अशा व्यक्तीची निवड करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी आंबेडकरी साहित्य विश्वातील मान्यवरांकडून नामनिर्देश आणि निवडी संबंधीच्या सूचना मागविल्या होत्या. यामध्ये प्रा.भवरे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दर्शविण्यात आली. आंबेडकरी साहित्य दालनाच्या आवाहनानुसार आयोजन समितीने महेंद्र भवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी वामनदादा कर्डक, बाबुराव बागूल, डॉ. गंगाधर पानतावणे, राजा ढाले, अविनाश डोळस, यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे अशा दिग्गजांनी या संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.

डॉ. भवरे हे मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत. कवी, समीक्षक, संशोधक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 'चिंताक्रांत मुलुखाचे रुदन', 'महासत्तेचे पीडादान' हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'दलित कवितेतील नवे प्रवाह', 'मराठी कवितेच्या नव्या दिशा', 'दलित कविता आणि प्रतिमा' हे समीक्षाग्रंथ बहुचर्चित ठरले. 'प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास' या ग्रंथाच्या संपादनासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङमयेतिहासाच्या आठ पुस्तकांचे संपादन केले आहे.

अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांचा 'मराठी दलित कवितेचा इतिहास' हा बृहद ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कारासह अनुष्टुभ प्रतिष्ठानचा विभावरी पाटील पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार, कविता राजधानी, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे सचिव आनंद गायकवाड, कवडूजी नागराळे, सुनील वासनिक, नवनीत महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही अध्यक्षपदाची घोषणा केली आहे.