Dhananjay Munde Vs Pankaja Munde News: राजकारणामुळं देशासह आपल्या राज्यातील अनेक राजकीय कुटुंबांमध्ये दरी निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक कुटुंबांमध्ये राजकारणामुळं दुरावा निर्माण झाला आहे. आज परळी येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidynath Sahkari Sakhar Karkhana Parli Beed) आज एक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे एकत्र येणार होते. त्यामुळे प्रशासन आणि कार्यकर्ते देखील अलर्टवर होते. सकाळी 11 वाजता बरोबर पंकजा मुंडे बैठकीला पोहोचल्या. मात्र या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले नाहीत. 


ते कारखान्यावर येताच कारखान्याच्या एमडी यांच्या कार्यालयात जाऊन बसले आणि इकडे पंकजा मुंडे सभा संपवून निघून गेल्या. यानंतर यावर धनंजय मुंडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही एकमेकांसमोर आलो असतो तर एखादा राजकीय प्रसंग घडला असता. 


कारखान्यावर पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असताना धनंजय मुंडे एमडीच्या कार्यालयात बसून होते.  बैठक संपल्यानंतर कारखान्याचे संचालक मंडळ आणि एमडी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी आले. धनंजय मुंडे यांनी कारखान्यावर काम करणाऱ्या पगारांचं नऊ महिन्याचं वेतन थकलेला आहे, त्याचबरोबर वाहतूकदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील पैसे थकले असून ते लवकर अदा करावेत यासाठी एक निवेदन एमडी आणि संचालक मंडळांना दिलं आहे.
 
सर्वसाधारण बैठकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र येणार होते. असं सर्वांनाच वाटत होतं मात्र तसं झाल्याचं पाहायला मिळालं नाही. यावर्षी मोठी हिंमत करून कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अनेक शेतकरी याच कारखान्याच्या जीवावर उसाची लागवड करतात म्हणून यावर्षी कारखाना गाळप करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी बैठक संपल्यानंतर सांगितलं. 


रक्ताची नाती कधी तुटत नसतात- धनंजय मुंडे


धनंजय मुंडे यांनी काल जे पंकजा मुंडे आणि त्यांच्यातील नातं तुटल्याच्या वक्तव्यावर बोलताना म्हटलं की, रक्ताची नाती कधी तुटत नसतात, असं म्हटलं. धनंजय मुंडे यांनी नातं तुटल्याची जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला पूर्णविराम दिला. राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांमध्ये देखील बहिण भावाचं नातं राहिलेलं नाही. याची कबुलीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. आमचं आता बहीण भावाचं नात राहिलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. राजकारणातून नात्यात वैर निर्माण झालं असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. मात्र आज त्यांनी या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: