मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. कोल्हापुरातून धनंजय महाडिक, तर रायगडमधून सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे.


धनंजय महाडिक हे कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. मात्र धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन अंतर्गत वाद मिटवल्याची माहिती आहे. त्यामुळे महाडिकांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

दुसरीकडे, रायगडमधला वाद सोडवण्यातही शरद पवारांना यश आलं आहे. रायगडमधून निवडणूक लढवण्यास माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव इच्छुक होते. मात्र शरद पवारांनी तटकरेंच्या बाजूने कौल दिल्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

याआधीच पुणे लोकसभा मतदारसंघाचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला होता. शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेवरील हट्ट सोडला. त्यामुळे जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आलं.

शरद पवारांनी पुण्याची जागा लढवावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. परंतु आपण 2019 ची लोकसभा निवडणून लढवणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. 2014 लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत पतंगराव कदम पुण्याच्या जागेवर लढले होते. इथे भाजपच्या अनिल शिरोळे यांचा विजय झाला होता.

अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितल्याचंही म्हटलं जातं. त्यापैकी पुण्याचा तिढा सुटला.