सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या उत्पन्नात मागील दहा वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. देशभरातील भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या चरणी तब्बल 161 कोटी रुपयांची रोकड मोठ्या श्रध्देने अर्पण केली आहे. तर मागील दहा वर्षांत देवीच्या चरणी 161 किलो सोने आणि तीन हजार 57 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे.


दानपेटी लिलाव प्रक्रिया बंद केल्यामुळे तुळजाभवानी देवीच्या श्रीमंतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी देवीचरणी केवळ 34 ग्रॅम सोने आणि 900 ग्रॅम चांदी अर्पण केली असल्याची नोंद आहे. दानपेटीवर डल्ला मारुन अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांनी तब्बल दोन हजार कोटी रूपयांची लूट केली असल्याचा सीआयडीचा चौकशी अहवाल एबीपी माझाने सर्वप्रथम उजेडात आणला होता. अद्याप त्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

तुळजाभवानी मंदिरात दानपेटी लिलाव करण्याची प्रक्रिया 2010 पूर्वी सुरू होती. दानपेटीतील रोकड ठेकेदाराला आणि मौल्यवान दागदागिने तथा वस्तू मंदीर प्रशासनाला असा करार होता. या करारानुसार 2010 पूर्वीच्या सहा वर्षांत नोंदविली गेलेली आकडेवारी अचंबित करणारी आहे. या आकडेवारीनुसार 2010 पूर्वीच्या सहा वर्षांत दानपेटीत केवळ 34 ग्रॅम सोने आणि 900 ग्रॅम चांदी भाविकांनी अर्पण केली असल्याची नोंद आहे.

पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे यांच्या तक्रारीवरून सहधर्मादाय आयुक्तांनी दानपेटी लिलावमुक्त केली. त्याचवर्षी 18 मार्च ते 18 एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत 22 लाख रुपयांची रोकड, 44 तोळे सोने आणि 900 ग्रॅम चांदी जगदंबेच्या तिजोरीत जमा झाली. तेंव्हापासून सुरु झालेला हा आलेख मागील दहा वर्षांत दुपटीच्या पुढे गेला आहे.

जून 2011 सालापर्यंत तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या उत्पन्नात झालेली घसघशीत वाढ सुमारे पाचशे कोटींहून अधिक आहे. वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या ठेवी आणि बचत खात्यांमध्ये शिल्लक असलेली रक्कम, असे एकूण 163 कोटी 21 लाख 31 हजार रूपये मंदिर संस्थानकडे आहेत. यामध्ये वेगवेगळ्या बँक खात्यात 146 कोटी 51 लाख 65 हजार रूपयांच्या ठेवी आहेत. तर वेगवेगळ्या बचत खात्यांवर 16 कोटी 69 लाख 66 हजार 437 रुपये जमा आहेत.

व्हिडीओ पाहा



दहा वर्षांपूर्वी मंदिर संस्थानकडे 73 किलो सोने जमा होते. त्यानंतर देशभरातून मोठ्या भाविकांनी तब्बल 90 किलो सोने अर्पण केले आहे. पूर्वी मंदीर संस्थानकडे 647 किलो चांदी जमा असल्याची नोंद आहे. मागील दहा वर्षांत देवीचरणी अर्पण केलेली चांदी दोन हजार 422 किलो एवढी आहे. त्या-त्या वेळी अर्पण केलेल्या सोने आणि चांदीचा अंदाजे भाव सांगणे कठीण असल्यामुळे सोने आणि चांदीचे रकमेतील नेमके मूल्य नमूद करण्यात आलेले नाही. परंतु एकूण रोकड आणि भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे दागदागिने, मौल्यवान वस्तू, वस्त्र आणि अलंकार या सर्वांची गोळाबेरीज सुमारे 500 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात तुळजाभवानी देवीच्या पारंपारिक दागदागिन्यांचा समावेश नाही.

सीआयडी अहवालानंतरही कारवाई नाही
दानपेटीचा लिलाव सुरु करण्यापूर्वी आणि लिलावात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार गंगणे यांनी दाखल केली. त्यानंतर सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. 2010 पूर्वी मागील 20 वर्षांत तब्बल 150 किलोहून अधिक सोने, चांदी आणि रोकड, असा अंदाजे दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा अहवाल सीआयडीने ऑगस्ट 2016 साली राज्य सरकारकडे दाखल केला. या अहवालात एका माजी मंत्र्यासह, 11 जिल्हाधिकारी, नऊ उपविभागीय अधिकारी, आठ नगराध्यक्ष आणि नऊ तहसीलदार अशा 42 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली होती. एबीपी माझाने राज्य सरकारकडे सादर झालेला हा चौकशी अहवाल 42 जणांच्या नावासह सर्वप्रथम प्रकाशित केला होता. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.