Ramdas Kadam on Uddhav Thackeray: भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सतत फोन करत होते. मात्र काँग्रेससोबत (Congress) जाण्यासाठी उध्दव ठाकरे यांनीच चर्चेची सगळी दारं बंद केली. असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.


उध्दव ठाकरे हे अमित शाह यांच्यासोबत बोलले असते तर  उध्दव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. मात्र अनेक फोन करूनही उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद दिला नाही. या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार असल्याचेही सांगत रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे. 


जिथे भारताचा झेंडा लावणं मुश्किल होतं तिथे भाजपने विजय मिळवला


मी कधीही राजकारण केलं नाही, चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे, हीच माझी भूमिका राहिली आहे. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवून उध्दव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. आज जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जे निकाल आले यावर बोलताना रामदास कदम यांच्याकडून भाजपचे अभिनंदन करण्यात आले. जिथे भारताचा झेंडा लावणं मुश्किल होतं तिथे आज भाजपने विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाला आणि त्यांनी बघितलेल्या विकसित भारताच्या संकल्पानेला तिथल्या जानेतेने साथ दिली आहे. किंबहुना आगामी काळात असाच विजय आमचा देखील महाराष्ट्रात निश्चित असल्याचा विश्वासही रामदास कदम यांनी बोलताना व्यक्त केला आहे. 


उद्धव ठाकरेंना मी बोललो होतो, दोन तासांत आमदारांना परत आणतो


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असे वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नुकतेच केलं होतं. दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांनंतर त्यांनी आज परत एकदा खळबळजनक दावा केला आहे. 


यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. गद्दारीची व्याख्या काय आहे, हे अनेकांना अद्याप कळलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले. शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले होतं. 


आणखी वाचा


शिंदे साहेब विधानसभेला मोदी-शाहांकडून 100 जागा मागा, वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला: रामदास कदम