नागपूर: केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांविरोधातील हिंसाचार हा लोकशाहीविरोधी असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच देशभरातील भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या सोबत असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आंदोलन सुरु केलं आहे. 


पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यभर आंदोलन केलं जातंय. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वत:ला पुरोगामी म्हणणारे पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर गप्प का आहेत. केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत."


ममता दीदींना वेगवेगळ्या उपमा देणारे आता हिंसाचारावर काय बोलणार हा आमच्या समोर सवाल आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांना टोला लगावला. 


सध्या कोरोनाचा काळ आहे अन्यथा आमची बंगालमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची तयारी आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या बंगालमध्ये जो नरसंहार सुरू आहे तो थांबवणे आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं हीच आमची प्राथमिकता आहे असं त्यांनी सांगितलं. 


महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे की बंगालमधील ज्या कार्यकर्त्यांची घरे जाळण्यात आली आहेत त्यांना राज्य भाजपाच्या वतीने नवीन घरे बांधून देण्याची परवानगी द्यावी अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला असून तो हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 


महत्वाच्या बातम्या :