पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.


कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री , आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारीपर्यंत सुरु ठेवल्याने यात्रा जत्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाची नवीन वर्षात येणार माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने प्रशासनाने या यात्राही भाविकांविना करण्याचे नियोजन करीत आहे. त्यानुसार मंदिर समितीने 22 व 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवं , प्रदक्षिणा मार्ग या भागात 144 कलम पुकारून संचारबंदीचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.




पांडुरंगाची भेट लांबली; कोरोनाच्या संकटामुळं माघ वारीही रद्द


दरम्यान शहर, तालुका, जिल्हा किंवा राज्यातून कोणताही भाविक यात्रेला पंढरपूरला येऊ नये यासाठी आषाढी कार्तिकी प्रमाणे त्रिस्तरीय नाकाबंदी माघी यात्रेतही लावणार असल्याचे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले . दरम्यान आमच्या प्रथा परंपरा तरी मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व्हाव्यात अशी वारकरी संप्रदायाची अपेक्षा असून शासनाच्या निर्णयाकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे .