मालेगाव : मालेगावातील लग्नाच्या वऱ्हाडाला गुजरातमधील तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की वऱ्हाडाची लक्झरी बस अर्धी कापली गेली. दरम्यान अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


तापी जिल्ह्यात आज (5 फेब्रुवारी) पहाटे हा भीषण अपघात झाला. मालेगावातील हजार खोली परिसरातून सुरतकडे एक वऱ्हाड लग्नासाठी निघाले होते. आज दुपारी हे लग्न होणार होते. मात्र, लग्नाला वऱ्हाडी मंडळीच्या खासगी बसला पहाटेच्या सुमारास गुजरातमधील तापी जिल्ह्यात वालोद गावाजवळ व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.



भरधाव असेलली लक्झरी बस एका पार्क केलेल्या ट्रकला जाऊन आदळली. या घटनेत बस अर्ध्यापर्यंत कापली गेली आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लक्झरी बस महाराष्ट्रातील मालेगाव ते दक्षिण गुजरातमधील सुरत येथे एका लग्नाच्या पार्टीत होती, अशी माहिती वालोद पोलिस स्टेशनचे निरीक्षक व्ही. आर. वासावा यांनी दिली.