Coronavirus updates :  जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झालेल्या कोरोनाच्या कारणामुळे पुन्हा एकदा बंद होण्याची भीती आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची प्रकरणे वाढत राहिल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. 


शाळा सुरू करण्याच्या SOP नुसार, शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. 


नवी मुंबईच्या घनसोली येथे अठरा विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते.  त्यानंतर आम्ही लगेच त्यांना विलगीकरणामध्ये पाठवले होते. आम्ही पूर्ण तयारी करूनच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. 


ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे आढळत आहेत, त्या ठिकाणी तिथे स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग निर्णय घेत आहे. आम्ही याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. जर ओमायक्रोन कोरोना संसर्गाची संख्या वाढली तर आम्हाला शाळा बंद करण्याबाबतही विचार करावा लागू शकतो असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. 


मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा अखेरीस 15 डिसेंबरपासून सुरू झाल्या होत्या.  मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये फक्त 34 टक्के पालकांनी संमती पत्र दिले होते. राज्यात एक डिसेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. विविध महापालिकांनी स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha