मुंबई : राज्यात कोरोनामुळे संचारबंदी असताना नागरिक या ना त्या कारणाने घराबाहेर पडणं बंद करत नसल्याचं चित्र आहे. यात आता एपीएमसी मार्केटची भर पडली आहे. सोबतच अनेक ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी देखील नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जागोजागी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावला असला तरी भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने त्याची खरेदीसाठी लोकं संचारबंदीचा नियम मोडत असल्याचे चित्र आहे.


वाशी एपीएमसीत गर्दी

वाशी एपीएमसी मार्केट सुरू केल्याने राज्यातील आणि परराज्यातील मिळून 1000 भाजीपाला गाड्यांची आवक आज झाल्याची माहिती आहे. भाजीपाल्याच्या गाड्यांना सॅनिटायझर फवारणी करून एपीएमसीत प्रवेश दिला जात आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक होत असल्याचे चित्र आहे. गर्दी वर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाकडून बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग होत नसल्याचे चित्र आहे. गाड्या मोठ्या प्रमाणात आल्याने लांबच लांब रांग झाल्याचे चित्र आहेत. दरम्यान भाजीपाल्याचे दर उतरले असल्याची देखील माहिती आहे. एपीएमसीने एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने भाजीपाला न आणता थेट मुंबईत काही गाड्या पाठविल्यास एपीएमसी मधील गर्दी कमी होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे. गर्दीचे विकेंद्रीकरण न केल्यास एपीएमसीत कोरोना व्हायरसचा धोका होण्याची संभावना आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी जीवघेणे प्रयोग, अनेक ठिकाणी माणसांनी भरलेली वाहनं पकडली

लातूरमध्ये भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी

लातुरात सर्वत्र लोकांचा वावर वाढला असल्याचे चित्र आहे. भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. सकाळी लातूरच्या भाजी बाजारात आलेल्या लोकांनी सुरक्षेसाठी कोणतीही काळजी घेतलेली नव्हती. यामुळे लॉकडाऊनच्या उद्देशाला मुरड बसत आहे. एकमेकात अंतर न ठेवता हे सर्व वावरत असल्याचे चित्र आहे. यात विवेकानंद चौक,गंज गोलाई,शाहू चौक,औसा रोड, अंबाजोगाई रोड लोक मुक्तपणे फिरताना दिसत होते.

सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाल्या रस्त्यांमध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा

बेळगावमध्ये भाजीपाल्याची विक्रमी आवक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पन्नाची विक्री करण्यासाठी बेळगावला येऊ नये. आपल्या तालुक्यातील एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्री करावी असा आदेश बजावला आहे. असे असताना एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. शेतकरी,दलाल ,व्यापारी आणि खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.या सगळ्यांना सोशल डिस्टन्स राखा म्हणून सांगण्यासाठी महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांना शेवटी हातात लाठी घेऊन समजावून सांगावे लागले.

एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सकाळपासूनच अनेक वाहनातून शेतकरी भाजी घेऊन येण्यास प्रारंभ झाला होता.त्यामुळे संपूर्ण भाजी मार्केट मध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.सकाळी भाजीपाला एपीएमसी मार्केटमध्ये नेताना अडवणूक करणाऱ्या रखवालदाराला देखील शेतकऱ्यांकडून चोप मिळाला.गेले अनेक दिवस मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला टाकून द्यावा लागल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.