नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीच्या संकटाने देशातील प्रत्येक वर्ग भीतीच्या सावटाखाली आहे. याचं पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात मजूर आणि गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत. देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केल्याने अनेक ठिकाणी मजूर आपल्या घरी पोहोचण्यासाठी परिवारासह पायी शेकडो किलोमीटर चालून आपले घर गाठत आहेत. यातील लाखो मजूर अजूनही रस्त्यात अडकले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं असून या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती या पत्रात केली आहे.


सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे की, देशव्यापी लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी आपल्या घरी चाललेले अनेक मजूर आणि त्यांचे परिवार रस्त्यावरच अडकले आहेत. या मजूर आणि गरिबांना मदतीसाठी राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतला जावा. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे या लोकांना घरी पोहोचण्यासाठी राज्य परिवहन सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार; भिवंडीतील आदिवासी कुटुंब पाच दिवस उपाशी

सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे की, देशभरात लाखो मजूर रस्त्यावरच अडकले आहेत. पायी घरी जात आहेत. तर काही लोकं गेस्ट हाऊस आणि हॉटेल्समध्ये अडकले आहेत, त्यांच्याजवळ देखील पैसे नाहीत. या लोकांना घरी पोहोचण्यासाठी परिवहन व्यवस्था करावी.

सोनिया गांधी पत्रात म्हटलं आहे की, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी स्तरावरून अशा लोकांची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांना आणि त्यांच्या परिवाराला खाण्यापिण्याची व्यवस्था करावी. हे लोकं हॉटेल आणि गेस्ट हाऊस सारख्या ठिकाणी जाऊन स्वतःची व्यवस्था करू शकत नाहीत, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.