उस्मानाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास फक्त लोकच जबाबदार आहेत का? राजकीय नेते, त्यांचे पक्ष आणि प्रशासनाचा निष्काळजीपणाला कोण जबाबदार धरणार असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (16 फेब्रुवारी) राज्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देतानाची एक ॲडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी सूचना देताना विचारलेल्या मुद्द्यांमधूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. कोरोनाचा आलेख कमी होत असताना प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांवरच्या कारवाया, कोरोनाच्या चाचणी आणि कोरोनाबाधितांची ट्रेसिंग का कमी केली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुनील केंद्रेकर या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत की, "नांदेड, परभणी, बीड आणि औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी प्रशासकीय पातळीवर हलगर्जीपणा केला आहे. कोरोना आटोक्यात असताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असो वा कोरोना चाचण्या वाढवल्याच नाहीत. ज्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती त्यात नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहिलं नाही. हिंगोली, परभणीत चाचणीचं प्रमाण कमी आहे. आज परिस्थिती अशी आहे की, आजपर्यंत दुहेरी असलेला आकडा आता तिहेरी झाला आहे."

मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लोक नियम विसरले आहेत. मास्कशिवाय फिरत आहेत. "कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा असं सुनील केंद्रेकर वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहेत," असं ते ऑडिओ क्लिप ते बोलत असल्याचं समजतं.

कोरोना वाढतोय याची तीन मोठी कारणे आहेत.
पहिलं कारण - प्रशासन, जनता आणि राजकीय पातळीवरचा निष्काळजीपणा
दुसरं कारण - अचानक वाढलेली थंडी
तिसरं कारण - नवा स्ट्रेन

विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

1. सर्व मंगलकार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन मारायला सुरुवात करा. जर तिथे विना मास्कचे लोक दिसले आणि अलाऊड संख्येपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे, फाईन लावला पाहिजे आणि त्यांना पोलीस केस दाखल करुन त्या नोटीसमध्ये उल्लेख केला पाहिजे. जर दुसऱ्या वेळी सापडले तर गुन्हे दाखल करा आणि हे मंगलकार्यालय 15 दिवसांसाठी सील करा

2. जे कोचिंग क्लासेस आहेत तिथे सुद्धा जाऊन पहिल्यांदा रेड करा, फाईन मारा. मुलांनी मास्क लावले आहेत की नाही, सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे की नाही ते बघा. हिंगोली आणि परभणी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत की तुमच्या विभागातून फीडबॅक यायला लागले आहेत की मोठमोठी लग्न होत आहेत आणि काही कारवाई केली जात नाही. मला या तातडीने कारवाई पाहिजे. लोकांना वॉर्निंग द्या की जर अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावावं लागेल आणि हे लॉकडाऊन कडक स्वरुपाचं असेल. जर आपण स्वत:ला वाचवू शकलो तर बरं आहे नाहीतर पुन्हा तुमचे उन्हाळ्याचे दिवस याच तापात जातील.

मागील वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये कोरोनाचा चढा काळ होता. या काळामध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेमध्ये जे लोक बाधित झाले त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीज तीन ते साडेतीन महिने राहिल्या असतील असा अंदाज आहे. आकडेवारी सांगते की महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू देशात अधिक आहेत. आता देशात कोरोना कमी होत असताना केरळ आणि आपल्या महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. या फक्त लोकांना दोष देऊन कसं चालेल? असा प्रश्न विचारला जात आहे.