मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता, पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारिख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली होती. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता राज्यातील परिस्थिती आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा उर्वरित एक पेपर पुढे ढकलला असून तो 31 मार्चनंतर होणार असल्याची घोषणा केली आहे.



राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना याआधीच 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सरकारने आता पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


पाहा व्हिडीओ : पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द, नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 मार्चनंतर - शिक्षणमंत्री



वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेले तीन प्रमुख निर्णय
- दहावीचा उर्वरित एक पेपर 31 मार्चनंतर
- पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द
- नववी आणि अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम


जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं बंद : उद्धव ठाकरे


राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | पहिली ते आठवीची परीक्षा रद्द; नववी, अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर


Coronavirus | महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर : आरोग्यमंत्री राजेश टोपे