मुंबई: काँग्रेस सोडताना गांधी कुटुंबावर खोटे आरोप करणारे गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे कृतघ्न असून G-23 गटाच्या नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत राहुल गांधी यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी हा आरोप केला आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला, परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी हे लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्वाची पदे दिली. पण आज त्याच गांधी परिवाराविरोधात चुकीची वक्तव्यं केली जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनाही पक्षाने आणि गांधी कुटुंबाने 50 वर्षात सर्व महत्वाची पदे दिली. परंतु आझाद आणि जी 23 नेते मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने करत आहेत."


गुलाम नबी आझाद मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहेत 


प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, "मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी कनेक्शन कापले होते. पण गुलाम नबी आजाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला आणि सोयी सुविधा अजूनही कायम आहेत. ते मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत. देशात आज गंभीर परिस्थिती आहे, सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत, संविधान धोक्यात आहे अशावेळी भाजपाला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते काँग्रेस पक्षालाच बदनाम करण्याचे काम करत आहेत."


भाजपा देशभरात हायवेचे जाळे पसरवल्याचा डंका पिटत आहे पण त्यासाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दर महिन्याला 44 हजार कोटी रुपये द्यावे लागत असल्याचं नाना पटोले म्हणाले. ते म्हणाले की, "जनतेवर एवढा मोठा कर्जाचा बोझा टाकून विकास कसला करता. मुंबई- गोवा महामार्ग 12 वर्षांपासून रखडलेला आहे, खड्डे बुजवण्याचे आदेश दिले तरी ते बुजवले जात नाहीत. या खड्ड्याने अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहेत, त्यांना फक्त मलिदा खायचा आहे. देशभरातील हायवे असो वा समृद्धी महामार्ग असो यात किती पाप लपले आहे हे येणाऱ्या काळात समजलेच."