Prithviraj Chavan : काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या विरोधात काम करायला पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) पाठवले होते, तटकरेंनी केलेल्या या वक्तव्याला त्यांनी बालिशपणा अशीच उपमा दिली. दिल्लीवरुन चव्हाणांना सुपारी घेऊन पाठवलं होतं, असे सुनील तटकरे म्हणाले होते. त्यावर चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. त्याशिवाय छगन भुजबळांची (chhagan bhujbal) भूमिका, मराठा आरक्षण (maratha arkshan) आणि साखर कारखाने थक हमी योजनाबद्दलही त्यांनी मत मांडले. 


सुनील तटकरेंचं वक्तव्य बालिशपणाचे - 


पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सुनील तटकरे यांनी घणाघाती टीका केली होती. दिल्लीवरुन चव्हाणांना सुपारी घेऊन पाठवलं होतं, असा आरोप तटकरे यांनी केला होता. याला आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी तटकरेंच्या वक्तव्याला बालिशपणा अशीच उपमा दिली. ते म्हणाले की, हा बालिशपणा आहे. दिल्लीतल्या नेत्यांना एवढचं काम आहे का? मला कोणतीही सुपारी किंवा कंत्राट दिलं नव्हतं. आमचं सरकार पडलं गेलं नसतं तर आम्ही टिकवलं असतं, हेच माझं विधान होतं. 


एकनाथ शिंदेंना वेळ देऊयात -


मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांना मुदत दिली आहे. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवूया, त्यांना वेळ देऊयात, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. जातियजनगणना करावी, ही आमच्या पक्षाची भुमिका आहे, असेही त्यांनी सांगितलं. फक्त जातीय जणगणना नाही ही इकॉनॉमिक सेन्सक्सवर असेल म्हणजे आर्थिक आणि सामाजिक गोष्टींवर निर्भर असेल. 


16 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला -


आमच्या सरकारमध्ये आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला, असे विधान मी पुण्यातील एका कार्यक्रमात  केलं होतं. संख्यात्मक माहिती गोळा केली त्यासाठी एक वर्ष लागलं. तो निर्णय कोर्टात आव्हान दिलं गेलं.  आमचं सरकार जर पाडलं गेलं नसतं तर तो निर्णय आम्ही कोर्टात टिकवला असतं, असेही चव्हाण म्हणाले. राज्याच्या निर्मितीनंतर मराठा आरक्षणाचा विषय आम्ही हाती घेतला होता. ज्यात आम्ही 2014 साली शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं असतं, आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही तो निर्णय टिकवला असता असं ते विधान होतं. त्यामुळे तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


भुजबळांवर काय म्हणाले ?
 
छगन भुजबळ मंत्रिमंडळातले सदस्य आहेत. स्वत:चे मत आग्रहाने ते मांडू शकत नाही. ते बोलतायत त्याला मंत्रिमंडळाची मान्यता आहे किंवा मुख्यमंत्र्यांची त्याला मान्यता आहे असं असतं. जनतेत गोष्टी मांडताना सद्भावना बिघडवू नये, त्यांना विधानं करत राजकारण करायचं असेल तर तसं त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे, असा सल्ला चव्हाणांनी भुजबळांना दिला.


साखर कारखाने थक हमी योजनाबद्दल काय म्हणाले चव्हाण - 


सहकारी साखर कारखाने थक हमी योजना, ही परंपरा अतिशय चुकीची आहे. कुणाच्या आग्रहामुळे ही योजना परत सुरु झाली मला माहिती नाही. शेतकऱ्यांनी कर्ज बुडवल्यानंतर काय होतं तुम्हा सर्वांना माहित आहे.  मात्र एखादा सहकारी साखर कारखान्याने भ्रष्टाचार करून जर थकमीचे कर्ज बुडवले तर त्याला महाराष्ट्राच्या जनतेने थकहमी द्यायची का  ..? असा सवाल उपस्थित करत हा निर्णय चुकीचं असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने आंदोलन केले पाहिजे आणि हा सरकारला परत निर्णय घ्यायला लावला पाहिजे, असेही ते म्हणाले.  


सपोर्ट शुगर केनबद्दल मी काहीही बोलणार नाही हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याला शिंदे-फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा जबाबदार आहेत. 
त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे लागेल, असे चव्हाण म्हणाले. एखाद्या सामान्य जनतेने म्हशी, गाईसाठी जर कर्ज घेतलं आणि ते जर वेळेत फेडू नाही शकला तर जिल्हा बँका काय करतात हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. मोठे मोठे साखर कारखानदार शेकडो कोटीचं कर्ज बुडवतात, कशा पद्धतीचा व्यवस्थापन करतात आणि खासगी साखर कारखाने विकत घेतात. आणि त्यांनी बुडवलेल्या कर्जाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्र सरकारने थक हमी द्यायची का? हा निर्णय आम्ही बंद केला होता तो पुन्हा या सरकारने चालू केला आहे याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 


हिवाळी अधिवेशन - 


कामकाज सल्लागार समितीने हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सात तारखेंपासून अधिवेशन सुरु होणार आहे. यामध्ये जनतेचे प्रश्न चर्चेत येतील. नागपूर परिसरात परिसरात पाऊस झाला, हवामान बदलाचे परिणाम आहे. त्यावर उपाययोजना कराव्या अशी विनंती केली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.