Shivsena Uddhav Thackeray Speech : काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 


Uddhav Thackeray Speech: 'अनेक पक्ष स्वबळाचा नारा देताहेत, आपणही देऊ, स्वबळ हा आपला हक्क' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे 



  1. अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे


  2. खूनखराबा करणे हा शिवसैनिकाची ओळख नाही परंतु अन्यायावर वार करणे आहे. रक्तपात नाही तर रक्तदान करणे ही शिवसैनिकांची ओळख आहे. आरोप करणार्‍यांपैकी कितीजणांची ही ओळख आहे?


  3. राज्यात आज आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांचं ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन. सत्ता न मिळवल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.


  4. जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पुढे गेले. संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आमची शिकवण आहे.


  5. तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणे हे माझे भाग्य. हे सर्व तुमच्या मेहनतीचं आणि आशिर्वादाच फळ. तुमच्याशिवाय मी एक पाऊल काय, एक कणही पुढे जाऊ शकत नाही


  6. 55 वर्षे आपण जे राजकारण पाहिलं त्यात जे दिग्गज राजकारणी होते. आताच्या नेत्यांची उंची कळतेय. या कोरोनाच्या काळातही जे राजकारण चालले आहे ते राजकारणाचे विकृतीकरण होते, किंबहुना विद्रुपीकरण आहे.


  7. आपल्या प्रशासनाची सुद्धा कमाल आहे.पहिल्या, दुसर्‍या लाटेच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. फोन आला की धस्स होत असे. परंतु प्रशासनाची मेहनत, जनतेची मदत शिवसैनिकांची समाजसेवेचे हे फलित आहे.


  8. पूर्वी खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणूस पेटून उठला.


  9. महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही. अजून किती काळ हे संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविड नंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत. पोस्ट कोविड आरोग्यच्या तक्रारी आहेत परंतु अन्य देखील परिस्थिती उद्भवणार आहे. परिवारातील लोक निवर्तली आहेत, कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत, अनेक रोजगार बुडाले आहेत.   


  10. रोजीरोटी मंदावली आहे. पोस्ट कोविड माझ काय होणार या एका चिंतेत देशवासी आहेत. अशा वातावरणात स्वबळ वगैरे देशवासी ऐकून घेणार नाहीत. हा विचार आपण केला नाही तर अराजकता मोठा शब्द ठरेल परंतु अस्वस्थतेकडे चालला आहे.  सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवुन जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही.