यवतमाळ : आघाडी सरकारने आम्हाला रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. एकवेळ आमच्या हातून चूक होऊ शकते पण बेईमानी नाही, अशा शब्दात  मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.


बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते घारफळ येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, “जुन्या सरकारने रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. मात्र आमच्या पाठीशी मोदीजी आणि गडकरी हे नेते आहेत. त्यामुळे आमच्या समोर कितीही मोठा प्रश्न असला, तरी प्रश्नांची गुरुकिल्ली आमच्या कडे आहे. आमच्या हातून चूक होऊ शकते; बेईमानी होऊ शकत नाही.”

यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या मिश्किल शैलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची फिरकी घेतली. गडकरी म्हणाले की, “राज्यातील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. ते प्रकल्प म्हणजे कुणी तरी हुंडा घेतला, लग्न केलं, हनिमून झालं, मुलं झाली आणि देवेंद्र फडणवीसच्या अंगावर ती मूल खेळत असून ते मूल आम्हाला जेवू घाला असे म्हणत आहे.”

राज्यातल्या अपूर्ण प्रकल्पांबाबत गडकरी पुढे म्हणाले की, एक वर्षाच्या आत प्रकल्पला जेवढे पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. पण कामं वेळेत पूर्ण करा, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आज कार्यन्वित झालेल्या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ाला 738 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीमधून जिल्ह्यातील रखडलेले 15 प्रकल्प पूर्ण केल्या जाणार आहेत.  86 गावातील 8349 शेतकऱ्यांना कायम स्वरूपी सिंचनाचा फायदा मिळणार आहे.