Manoj Jarange Patil on Eknath Shinde : मराठा आरक्षणावर आता बोलून काही सुद्धा फायदा नाही, हे समाजाला सुद्धा कळत आहे. समाजाला सर्व कळत आहे, आमच्या मुलांवर दीड लाख केसेस झाल्या आणि फडणवीस यांनी आमचा खूप फायदा घेतल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला. आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या हा आमचा फायदाच आहे का? अशी विचारण मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 


मराठा आंदोलकांनी शेकडो बलिदान दिले हा आमचा फायदा आहे का?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी समजावून घ्यायला हवं अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी खोचक शब्दांमध्ये विचारणा केली आहे. ते म्हणाले की, आमच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या हा आमचा फायदा आहे का? सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ दिली नाही हा फायदा आहे का? सातारा, बॉम्बे आणि हैदराबाद गॅझेट लागू केलं नाही हा आमचा फायदा आहे का? आम्हाला म्हणाले, महाविकास आघाडीकडून लिहून आणा मग आता 15 जातीने ओबीसीमध्ये घेतल्या गेल्या, हा आमचा फायदा आहे का? आरक्षण आम्हाला नको होतं ते लादले गेले आणि आता ईडब्ल्यूएस बंद केलं आमचा फायदा आहे का?  आमच्या मराठा आंदोलकांनी शेकडो बलिदान दिले हा आमचा फायदा आहे का? अशी प्रश्नांची सरबत्तीच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 


दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आम्ही जस्टीस शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिलं, सारथी दिलं, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती देण्यात आल्या. हे सगळं कोणी केलं? मराठा समाजाला कोणी वंचित ठेवलं आणि कोणी दिलं, याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे  म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या