MP Nilesh Lanke on Sujay Vikhe Patil : खरा वाघ कधी सांगत नसतो, मी वाघ आहे. म्हणून नगरमधील जनतेने ठरवलं आहे कोण वाघ आहे. त्यामुळे मांजराने वाघाचा झुल पांघरलं म्हणजे तो वाघ होत नसतो ते जनतेने ठरवायचं असतं, अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. खासदार निलेश लंके आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंबाबाई मंदिरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.


निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे


खासदार निलेश लंके यांनी आगामी निवडणुकीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात बळीराजाचे म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्यांमध्ये बदल अटळ असल्याचा दावा सुद्धा निलेश लंके यांनी केला. ते म्हणाले की बेरोजगारी शेतकरी तरुणांच्या मुद्द्यांवर विचार करणारे सरकार राज्यांमध्ये स्थापन होईल. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की शरद पवार साहेबांकडे गेलो की आपण निवडून येऊ शकतो असं वाटत असल्याने आमच्याकडे सर्वाधिक इनकमिंग होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांचा सर्वाधिक स्ट्राईक होता, असेही त्यांनी सांगितले. 


शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता


दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता आज इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सभेला शरद पवार यांच्या बरोबर  सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना राष्ट्रवादीची ही सांगता सभा म्हणजे  राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील प्रचाराचा एकप्रकारे प्रारंभ करणारी सभा असणार आहे. 


राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभार यात्रेतून मांडण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.  9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत 24 दिवस पूर्ण झाले. शिवस्वराज्य यात्रा या 24 दिवसात 19 जिल्हे पूर्ण केले. यात्रेसाठी तब्बल 7365 किलोमीटरचा प्रवास केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघात केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या