CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री कराडहून कोल्हापूरमध्ये पोहोचतील. पंचगंगा घाटावर आयोजित कणेरी मठावरील सुमंगलम या आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या उद्‍घाटनाला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत जयसिंगपुरात शेतकरी मेळावा व जाहीर सभा होईल. तेथून ते कोल्हापूर विमानतळमार्गे रात्री आठ वाजता गोव्यातील कार्यक्रमासाठी रवाना होतील.


शरद कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा प्रारंभ


शरद कारखान्याने उभारलेल्या डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमासाठी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित असतील. 


कणेरी मठावर होणार सुमंगलम हा सोहळा


कणेरी येथील सिद्धगिरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमंगलम हा पंचमहाभुतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.  


दरम्यान, जवळपास 500 एकरवर कणेरी मठावर होत असलेल्या या कार्यक्रमाला 30 लाखांवर लोख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुमंगलम कार्यक्रमात परिषद, प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील सात ते आठ  राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, शेकडो विद्यापीठांचे कुलगुरु, तीन हजारांवर साधू संत, शेकडो शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील तज्ज्, डाॅक्टर उपस्थित राहणार आहेत. 


राजू शेट्टींकडून आंदोलन स्थगित


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने तसेच चक्काजामआंदोलनाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हा पोलिस प्रशासनाने शेट्टी यांच्याशी चर्चा करून बैठकीसाठी नियोजन करण्यात आले व आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. राजू शेट्टी आंदोलन स्थगित केल्यानंतर सांगितले की, दिवसभर फोनवरून चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी मागण्यांवर व्यापक बैठकीची आवश्यकता आहे. बैठकीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. त्यांनी तातडीने सहकार मंत्र्यांच्या सहीने तातडीने पत्र मला पाठवले आहे. बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त उपस्थित असतील. त्यांनी चक्का जाम मागे घेण्याची विनंती केली.


इतर महत्वाच्या बातम्या