रत्नागिरी : आरे कारशेडचं देखील नाणार होणार असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंनी दबावतंत्राची भाषा केल्यानंतर, नाणारमध्येच पुन्हा रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज कोकणात दाखल झाली आहे. रत्नागिरीमध्ये महाजनादेशच्या रथावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव बोलून दाखवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा सुरू केल्या. दरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं.  मात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे.


स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या विरोधाच्या रेट्यामुळे रद्द करण्यात आलेला नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्येच करण्याबाबतचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे दिले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आधीपासून सांगत होतो नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिले. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. या प्रकल्पामुळे कोकणातल्या एक लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे कोकणाचा कायापालट होणार आहे. ज्या प्रकारे याला विरोध झाला त्यामुळे आम्ही हा प्रकल्प थांबवला, मात्र आपला उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. आज कुठला निर्णय जाहीर करत नसलो तरी यावर चर्चा केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्याच्या या विधानानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भाजप- शिवसेना युतीमध्ये मोठी दरी निर्माण पडण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाणार प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. तसेच शिवसेना सुद्धा या प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. 'माझ्या जनतेवर अन्याय होत असताना मी गप्प बसणार नाही.' अर्थात मुख्यमंत्री 'फितूर' झाले असले तरी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

मोठ्या विरोधानंतर नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. दरम्यान, नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना देखील राजपत्रात प्रकाशित करण्यात आली होती.

18 मे 2017 रोजी नाणार प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कारसिंगवेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारिवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तारळ व गोठीवरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये, रामेश्वर येथील जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. 14 गावांतील सुमारे 15 हजार एकर जमिनी यासाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. ही अधिसूचना देखील रद्द करण्यात आली होती.

प्रकल्पक्षेत्रातील 14 ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधी ठराव मंजूर केले होते. तसेच कोकणातील सर्व आमदार आणि खासदारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. स्थानिक जनतेने भूसंपादनापूर्वी आवश्यक अशी जमीन मोजणी होऊ दिली नव्हती. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती.

संबंधित बातम्या

नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित


VIDEO | नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द | एबीपी माझा


नाणार रिफायनरी प्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे अखेर रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती


नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता


नाणार रिफायनरी विरोधात कोकणवासीयांचा 'एल्गार' | स्पेशल रिपोर्ट | मुंबई


कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही : उद्धव ठाकरे