Bhandara News भंडाराराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळे या महत्वकांशी,  प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे.


दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगाराची संधी   


वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) बॅक वॉटरवर जागतिक दर्जाचं पर्यटन प्रकल्प होत आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रकल्प होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. वैनगंगेच्या तीरावर होत असलेल्या भूमिपूजन सोहळा स्थळावर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने सज्ज झाली आहे. 


चार दशकांपासून रेंगाळलेल्या प्रकल्पाचा श्री गणेशा 


चार दशकांपासून रेंगाळलेल्या गोसेखुर्द धरणाच्या विकासकामच्या पहिल्या टप्प्याचा श्री गणेशा अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज होत आहे. गोसेखुर्द धरणाची घोषणा 1983 मध्ये करण्यात आली होती. आज या धरणाच्या कामाला सुरुवात होऊन चाळीस वर्ष उलटली आहेत. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे एकेकाळी विदर्भासाठी विकासाची भाग्यरेषा ठरेल असे ज्या गोसेखुर्द धरणाबद्दल बोलले जात होते. मात्र हे दावे चार दशकांपासून हवेतच असल्याची सध्याची स्थिती आहे.


विशेष म्हणजे 1983 मध्ये गोसेखुर्द धरण जाहीर झाला होता. तेव्हा त्या प्रकल्पाची नियोजित किंमत 372 कोटी रुपये होती. मात्र आज 40 वर्षानंतर गोसेखुर्द धरणाचा बजेट 20 हजार कोटींच्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षात रोज पावणे दोन कोटी रुपये एवढ्या गतीने या धरणाची किंमत वाढली आहे. त्यामुळे याची किंमत आणखी किती वाढणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


547 कोटी खर्च अपेक्षित


आज मुख्यमंत्री या ठिकाणी लवकरच सुरु होणाऱ्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन करणार आहेत. या विकासकामांमध्ये सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण, उजव्या आणि डाव्या कालव्याचे सौंदर्यीकरण, वैनगंगा नदीतीरावर सौंदर्यीकरण, भंडारा ते आंभोरा आणि गोसे धरणापर्यंत जलपर्यटन, रिसॉर्ट, क्रुज हाऊसबोर्ड, सी बोट, मरीना आणि रॅम्प, बम्परराईड, फ्लाईंग फीश, जेटाव्हेटर, पॅरासिलिंग यासह अनेक सुविधांसाठी 547 कोटी खर्च अपेक्षित आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhattisgarh Naxal : सुरक्षा दलाच्या वाहनावर माओवाद्यांचा सशस्त्र हल्ला; आयईडी स्फोटात दोन जवान शहीद