मुंबई : देशातील कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, केंद्र सरकारचं एक पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रभावित असलेल्या क्षेत्रात जाऊन त्यांचा पाहाणी दौरा सुरू आहे. या दौऱ्यात केंद्रीय पथक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढवा घेत आहे. आज हे केंद्रीय पथक बारामतीत दाखल झालं असून बारामतीतील कंटेन्मेंट झोनची पाहणी सुरू आहे.


बारामती जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सध्या शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करीत आहेत. याची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आली आहे. आज हे पथक बारामतीत आले असून शहरातील जे भाग सील करण्यात आले आहे किंवा कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. याची या पथकाकडून बारकाईने पाहणी केली केली जात आहे. तसेच शहरातील सिल्व्हर जुब्ली रुग्णालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी ही पाहणी करणार आहेत.

बारामतीत कोरोनाचे सात रुग्ण आढळले आणि त्यातील एकाचा मृत्यूही झाल्यानंतर राजस्थानमधील भीलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर बारामतीत बारामती पटर्न राबविला जात आहे. यामध्ये ज्या उपाय योजना आहेत,  त्या कितपत परिणामकारक ठरल्या याची ही पाहणी आणि माहिती केंद्रीय पथकाकडून घेतली जाणार आहे.

बारामतीत कोरोनाच्या संदर्भातील पार्श्वभूमी

बारामतीत कोरोनाचा  सर्वात पहिला रूग्ण 29 मार्च रोजी आढळून आला. बारामतीतील एका रिक्षाचालकाला याची सर्वप्रथम लागण झाली. त्यानंतर 6 एप्रिल रोजी समर्थ नगर भागातील एका भाजी विक्रेत्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भाजीविक्रेत्यासह त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी आणि दोन मुलीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. यातीलच वृद्ध माणसाचा 9 एप्रिलला उपचारादरम्यान कोरोनामुळे पुण्यात मृत्यू झाला. त्यानंतर 15 एप्रिल रोजी शहरातील म्हाडा कॉलनी येथील एका मेडिकल स्टोअर मध्ये काम करणाऱ्या युवकाच्या 77 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. या कुटुंबियांचे तपासणी केली असता त्यांचे अहवाल मात्र नेगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत बारामतीत कोरोनाचा अद्याप तरी एकही रुग्ण आढळलेला नाही.

कसा आहे बारामती पॅटर्न?

बारामती नगरपरिषद परिसरातील 44 वार्ड, 44 नगरसेवक, 44 झोनल ऑफिसर आणि 44 पोलीस अधिकारी, कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डात 10 ते 20 स्वयंसेवकांच्या माध्यमातून लोकांना घरपोच अत्यावश्यक सुविधा पुरवणार आहेत. एका स्वयंसेवकाला 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी यातून मिळणार आहे. हे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार त्या नागरिकांना आपला नंबर देणार अत्यावश्यक बाबींची गरज असल्यास नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवेकरता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरिता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला जाणार आणि नागरिकांना घरपोच सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील.