मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.


दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही. प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


Budget 2021 : विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांवर योजनांची खैरात, महाराष्ट्रासाठी काय?


देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला, अर्थसंकल्पातून भरीव काहीही आलं नसून महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका नजिक असल्याने पश्चिम बंगालला 25 हजार कोटी जाहीर केले, ते मिळतील याची खात्री नाही, असं अजित पवार म्हणाले.


अर्थसंकल्प नशिबावर सोडून चालणार नाही


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाबाबत अर्थमंत्र्यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं. क्रिकेटचा सामना नशिबानं साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाचा अर्थसंकल्प नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवं होतं. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय. परंतु हेआत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारं, अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका अजित पवार यांनी केली.


संबंधित बातम्या