LIVE UPDATES | रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती

Breaking News LIVE Updates, 28 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2021 08:46 AM
खामगावात खंडणी साठी प्राणघातक हल्ला ३ गंभीर जखमी ,२३ जणांवर गुन्हा. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

खामगाव येथील आठवडी बाजार भागातील एका भंगार व्यवसायिकावर खंडणीसाठी काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी २० ते २३ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुझी दुकान नगर परिषदच्या जागेमध्ये असून त्याचे मला तुम्हांस पैसे दयावे लागतील नाहीतर मी तुझी दुकान इथून हटवून टाकू  अशी  धमकी देत भंगार व्यावसाईक राजेंद्र इंगळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी २० २३ जणांना गोळा करून लाठयाकाठया,लोखंडी रॉड, हातोडी, सेंट्रींगच्या राफटर घेवून मारहाण करुन गंभीर जखमी केले. यांनतर भर बाजारात झालेली हि मारहाण अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्या नंतर पोलिसांनी आरोपीतांविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केले असून आरोपी सध्या फरार झाले आहेत. 

रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल, रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती

रश्मी ठाकरे रिलायन्स रुग्णालयात दाखल झाल्या असून काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, आज दिवसभरात 27 हजार 918 नव्या रुग्णांची नोंद, तर 139 रुग्णांचा मृत्यू

कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली. राज्याच्या आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळं 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण मात्र अडचणीच आणणारं ठरत आहे. आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार राज्यात मंगळवारी तब्बल 23,820 रुग्णांना रुग्णालयाचून रजा देण्यात आली. सध्या राज्याचा एकूण रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, भारतीय रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद राहणार आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वेत आग लागण्याचं प्रमाण वाढल्यानं भारतीय रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. 

परमबीर सिंह यांच्या लेटरबाँब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पाचवी याचिका दाखल

परमबीर सिंह यांच्या लेटरबाँब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात पाचवी याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि सी.ए. मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आरोपांची सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

इंदोरीकर महाराजां विरोधातील खटला रद्द, संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

इंदोरीकर महाराजां विरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराजांना कोर्टानं दिलासा दिला आहे. संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने अपील मंजूर केलं आहे. इंदोरीकर महाराजांच्या वतीनं अपील करण्यात आलं होतं. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केले होते. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतर समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं अनिसच्या वतीनं सांगण्यात येत आहे. 

मुलीच्यां लग्नात होणारा व्यर्थ खर्च टाळून गरजू लोकांना अकरा क्विंटल धान्याचं वाटप, बीडमधील घटना

बीड : बीडच्या धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तात्यासाहेब मेघारे यांनी आपल्या मुलीच्यां लग्नात होणारा व्यर्थ खर्च टाळून गरजू लोकांना अकरा क्विंटल धान्याचं वाटप केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्ननसमारंभावर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे फक्त कुटुंबियांच्याच उपस्थितीत त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे त्यांनी लग्नात होणाऱ्या खर्चातून हा सामाजिक उपक्रम राबवून चाळीस गरीब आणि गरजूंना धान्याच वाटप केल आहे. 


 
आठ हजाराची लाच स्विकारताना कोटकामते ग्रामसेवक ताब्यात, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूलच्या हप्त्यासाठी स्विकारली लाच



सिंधुदुर्ग : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकूलच्या तिसऱ्या हप्त्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते ग्रामसेवक दीपक चिंतु केतकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून ही कारवाई केली. ग्रामपंचायत कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.


 

 



 
रत्नागिरी गेली खड्ड्यात! शहरात जागोजागी खोदलेले रस्ते आणि त्यांची झालेली दुरावस्था

रत्नागिरी गेली खड्ड्यात! शहरातील खोदलेले रस्ते आणि त्यांची झालेली दुरावस्था यामुळे सध्या रत्नागिरी शहरातील हे चित्र आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या सर्वत्र खोदकाम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी किंवा काम संपताच सर्व रस्ते चकाचक करू असं प्रशासनाकडून, राज्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. पण, रत्नागिरीकरांची मात्र सध्याच्या स्थितीत तीव्र नाराजी दिसून येतेय. रस्ते खोदलेले असल्यामुळे अनेक ठिकाणी छोटे - छोटे अपघात देखील होताना दिसत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 31 मार्च रोजी शरद पवार रुग्णालयात दाखल होणार होते. परंतु, अचानक पोटात दुखू लागल्यानं शरद पवार यांना आजच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. 

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : DFO विनोद शिवकुमार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अटक झालेले DFO विनोद शिवकुमार यांना धारणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, त्यानंतर निलंबनाची झाली कारवाई

पुण्यातील राज्य शासनाच्या शिक्षण खात्याच्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीला भीषण आग

पुण्यात कुमठेकर रस्त्यावरील राज्य शासनाच्या शिक्षण खात्याच्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. इमारतीतील फर्नीचरसह साहित्य जळून खाक झाले आहे. 

वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा 15 दिवस पुढे ढकलला


सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा 15 दिवस पुढे ढकलला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 31 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात  हा प्रवेश होणार होता. पक्षाध्यक्ष शरद पवार आजारी असल्याने प्रवेश सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे.

नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये वृद्धाची आत्महत्या

नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात कोविड वॉर्डच्या बाथरूममध्ये वृद्धाची आत्महत्या, बाथरूममध्ये ऑक्सिजन पाईपला गळफास घेऊन आत्महत्या, पुषोत्तम गजभिये आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव

रत्नागिरी खेड घरडा केमिकल्सच्या स्फोटातील जखमी कर्मचाऱ्याचा मृत्यू, या प्रकणातील पाचवा मृत्यू

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्यात रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता तर एका जखमी कर्मचाऱ्यावर नवी मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. त्या जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. अभिजित सुरेश कवडे असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. यामुळे कवडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नाशिक : धूलिवंदन साजरा करून मुकणे धरणावर आंघोळीला गेलेल्या दोघांचा मृत्यू

धूलिवंदन साजरा करून धरणावर आंघोळीला गेलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यात समोर आली आहे. रंग खेळून होताच मुकणे धरण परिसरात दहा ते पंधरा मित्र काल दुपारी आंघोळीसाठी गेले होते मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाले त्यातील एकाला वाचविण्यात यश आले मात्र दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही जिंदल पॉलिफिल्म कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती असून मृतांमध्ये सिंग खरकसिंग बिस्ट आणि मनोज मोहन यांचा समावेश आहे, दोघेही मूळचे उत्तराखंडचे आहेत. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावरील वसतीगृहात आग; विद्यार्थी सुखरूप

भिवंडीच्या मुंबई नाशिक महामार्गावरील वालशिंद येथे एका वसतीगृहात आग लागली. या आगीत वसतीगृहातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यास यश आलंय. मुंबई नाशिक महामार्गावर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वसतीगृह असून या वसतीगृहात आग लागली होती आणि यात 74 विद्यार्थी अडकले होते. यावेळी भिवंडी आणि कल्याण अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व विद्यार्थ्यांना रेस्क्यू करून सुटका केली आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

मोहिते पाटील यांच्या नवीन पक्ष नोंदणीने खळबळ

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावलेल्या मोहिते पाटील यांनी आता नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीचे प्रयत्न सुरु केल्याच्या चर्चेने भाजप नेत्यांचीही चिंता वाढू लागली आहे. मात्र हा पक्ष नसून स्थानिक राजकारणासाठी बनवलेली आघाडी असल्याचा दावा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू विश्वतेजसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मोहिते पाटील गटाने कृष्णा भीमा विकास आघाडी या नावाने निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. 

आळंदीत घेता येणार तुकाराम बीज सोहळ्याचा आनंद, रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाची मुभा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आज देहू नगरीच रेखाटण्यात आलेली आहे. विविध पानं- फुलं आणि संत तुकोबांच्या प्रतिमांनी इथं आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनामुळं तुकाराम बीज सोहळा मोजक्याच भाविकांमध्ये साजरा करावा लागतोय. त्यामुळे भाविकांना दर्शनाला जाता येणार नाहीये. पण तुकोबांच्या दर्शनाची पर्वणी आळंदी देवस्थानने यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत इथं भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

पार्श्वभूमी


  1. वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर प्राण्यांमधूनच कोरोनाचं संक्रमण, जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल


  2. लॉकडाऊनला सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारकडूनही विरोध, राष्ट्रवादीच्या विरोधानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष


  3. पुन्हा लॉकडाऊन नको! उद्योगपती आनंद महिंद्रांचंही मुख्यमंत्र्यांना आवाहन, आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा सल्ला


  4. औरंगाबादमधील लॉकडाऊनमध्ये अंशत: बदल, उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू होणार


  5. राज्यात काल दिवसभरात 31,643 नवे कोरोनाचे रुग्ण, राज्याचा मृत्यूदर 98 टक्क्यांवर


  6. नाशिकच्या बाजारपेठेत प्रवेशासाठी पाच रुपयांचं शुल्क, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि पालिकेचा फंडा


  7. नांदेडमध्ये शीख समाजाच्या हल्लामोहल्ला कार्यक्रमात पोलिसांवर तलवारीने हल्ला, चार पोलिस गंभीर जखमी


  8. अॅंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्याप्रकरणी NIA च्या हाती महत्त्वाचे पुरावे, आज आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता


  9. देहूमध्ये आज तुकाराम बीज सोहळा साजरा होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध


  10. राज्यातला उकाडा आणखी वाढणार, सर्व जिल्ह्यांच्या कमाल तापमानात वाढ, कोकणात आंब्यालाही फटका

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.