पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्यात बेहिशेबी काळा पैसा पांढरा झाला आहे. आयकर विभागाने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी औरंगाबाद विभाग आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.


रावसाहेब दानवे यांचे चिंरजीव आमदार संतोष दानवे यांचा 3 मार्च रोजी औरंगाबादेत शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाह समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि 35 ते 40 हजार लोक उपस्थित होते.

विवाहासाठी खास 1 कोटी रुपयांचा लग्नमंडप, दीड लाख लग्नपत्रिका, महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेसाठी 1500 बाउन्सर्स नेमण्यात आले होते. तसेच 40 हजार पाहुण्यांची भोजनासाठी विविध पक्वांन्नाची व्यवस्था करण्यात आली होती, असं असीम सरोद यांनी त्याच्या पत्रात म्हटलं आहे.

लग्नाच्या 2 ते 3 दिवस आधी आणि नंतरही औरंगाबादमधील बहुतांश पंचतारांकित हॉटेल बूक करण्यात आली होती. लग्नाकरिता 8 चार्टर विमाने तसेच एअर इंडियाच्या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दानवे यांचा कमार्इचा स्रोत आणि लग्नातील एकूण खर्च यातील तफावतीचा मेळ आयकर विभागाने तपासावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातमी : रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट, लाखो रुपयांची उधळण