Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजपने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. परंतु, काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा या निवडणुकीत विजय झाला तर भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव झाला.


भाजपच्या या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीवेळी आणि त्याआधी केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कोल्हापुरात पराभव झाला तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. शिवाय निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांच्या खात्यावर पेटीएमद्वारे एक हजार रूपये जरी आले तरी त्याची ईडीकडून चौकशी होऊ शकते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांची हीच वक्तव्ये आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या या वक्तव्यांमुळेच त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. 


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.  पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. 


काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठा विजय मिळवला. भाजपने या निवडणुकीत प्रचंड जोर लावला होता. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गजांनी इथे प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे कोल्हापुरातील महाविकास आघाडीचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. 


महत्वाच्या बातम्या