सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्घाटनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती असणं हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणेंनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाला गालबोट लागू नये असा आमचा प्रयत्न असणार आहे असंही नितेश राणे म्हणाले. दरम्यान आज व्यासपीठावरुन नारायण राणे त्यांचं मन मोकळं करणार आहेत. कुणाला ते आवडेल तर कुणाला ते खुपेल हे सांगायला नितेश राणे विसरले नाहीत. 


आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही, कोणतंही राजकारण केलं जाणार नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्वागत केलं जाईल, मुख्यमंत्री आणि आपण शेजारी-शेजारी बसण्याचा योग येणार आहे ही चांगली गोष्ट आहे असंही नारायण राणे म्हणाले. 


कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरु आहे, या हप्तेखोरांची नावे मी जाहीर करणार आहे. कोकणाच्या विकासाला आड येणाऱ्या लोकांचा भांडाफोड मी सभेत करणार आहे असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते. त्यावर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर आरोप करु नये अशी टीका शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली. 


शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या आरोपाला उत्तर देताना म्हणाले होते की, चिपी विमानतळाचं काम पूर्ण झाल्याने श्रमाचं फळ मिळाल्याचं समाधान मिळालं आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. नारायण राणेंनी अनेकवेळा भुमिपूजन करण्याचं काम केलं मात्र काम सुरु झालं नाही. काही जणांनी 934 हेक्टर जमीन विमानतळाच्या नावाखाली  हडपण्याचा प्रयत्न होता. त्यावेळी  लोकांनी आंदोलन केलं त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडस  करु नये. आजचा कार्यक्रम कोकणवासियांचा आहे. त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्य़ाची भावना त्यांच्यात नाही, त्यांचं हे दुर्देव आहे.  


दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनीही नारायण राणेंवर टीका केली आहे. नारायण राणे यांना माझं आव्हान आहे त्यांनी नाव जाहीर करावी असं ते म्हणाले. नारायण राणे आज कोणतीही नावं जाहीर करणार नाही. कारण त्यांना माहीत आहे कुणी हप्ते घेतले आणि कुणी काय केलं असंही ते म्हणाले. 


संबंधित बातम्या :