मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका बसलेल्या भाजपने आता विधानसभेच्या तोंडावर सावध पावले उचलत विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजपकडून आता रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा जणांची फायरबँड टीम (BJP Media Representative Team) तैनात करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे. 


भाजपकडून रोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. 


तर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून 6 जणांची टीम तैनात करण्यात आली असून त्यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते प्रतिक्रिया देणार आहेत. 
 
विभागवार बोलण्यासाठीही भाजपकडून 20 नेत्यांच्या तगड्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या विभागीय टीममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश आहे. 


महायुतीत भाजपने 170 ते 180 जागा लढण्याचा नेत्यांचा आग्रह


लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त म्हणजे 170 ते 180 जागा लढाव्यात असा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेसाठी 100 जागांची मागणी भाजपकडे केली होती. मात्र शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर 2019 पेक्षा कमी जागा भाजपला लढाव्या लागतील. त्यामुळे 170 ते 180 जागांपेक्षा कमी जागांवर भाजपने लढू नये असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. जेवढ्या जास्त जागा लढू तेवढा आधिक फायदा होईल असे मत भाजपच्या नेत्यांचे आहे. पुण्यात होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाच्या आधी भाजप विधानसभेच्या किती जागा लढेल हे निश्चित होईल.


ही बातमी वाचा: