मुंबई :  देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. स्वत:हून राजीनामा दिला नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे देशाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की राजीनामा द्या. वरिष्ठांकडून आदेश आहेत असं मला सांगितलं गेलं, त्यामुळं मी राजीनामा दिला, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.


खडसे यावेळी म्हणाले की, वरिष्ठांचं नाव सांगितल्याबरोबर मी कोऱ्या कागदावर सही केली होती. मी स्वत:हून राजीनामा दिला नव्हता. मात्र पक्षानं मला असं सांगितलं होतं की, बाहेर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घ्याल त्यावेळी तुम्ही असं सांगा की तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. स्वत:हून चौकशीची मागणी केली असं सांगा, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. मी त्यावेळी विचारलं माझी काही चूक नाही. पण त्यांनी वरिष्ठांचं नाव सांगितल्यामुळं मी राजीनामा दिला, असं खडसे म्हणाले.


एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला? खडसेंची खदखद आणि फडणवीसांचा निशाणा | स्पेशल रिपोर्ट


खडसे यावेळी म्हणाले की, 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे 40 वर्षाच्या राजकीय जीवनात मी सांभाळलं. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. त्यांना राजीनामा द्या असं म्हटलं गेलं नाही. मात्र माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडं वळती करण्यात आली. पदाचा दुरुपयोग केला असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असं खडसे म्हणाले.


मी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोधात बोलतोय असं म्हणणं चुकीचं आहे. मी अन्याय झाला म्हणून बोलतो आहे. अनेकांवर अन्याय झाला. माझ्या मुलीनं तिकीट मागितलं नसताना तिकिट दिलं. आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणाऱ्या जागी तिकिटं दिली नाहीत, त्यामुळं जागा कमी आल्या असंही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा आहे, त्यामुळं लोकांनी नाकारलं असंही खडसे म्हणाले.


लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार 


आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नुकतंच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, असं खडसे म्हणाले होते.  लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहिणार असून त्यातून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं खडसे म्हणाले होते. खडसे म्हणाले होते की, दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. यावेळच्या वाढदिवस सुनील नेवे यांच्या पुस्तका मुळे लक्षात राहील, मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे, असं खडसे म्हणाले होते.


मी चांगला, तर मग मला तिकीट का दिलं नाही?
भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचं म्हटलं. मग मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न मला आहे. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, असं खडसे म्हणाले होते. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ यांची भूमिका होती, असं ते म्हणाले होते.


संबंधित बातम्या


देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणावर एकनाथ खडसे म्हणतात.. 


खडसेंवर गुन्हा माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, फडणवीसांचं उत्तर


'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता, मग माझ्यावर एवढा राग का?', खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल


'10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायले' : एकनाथ खडसे