मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेसाठी चार नावांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये डॉ. अजित गोपछेडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज चारही उमेदवार दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या नावांची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून सर्व दिग्गजांना डावललं असल्याची चर्चा सुरु आहे.  माजी मंत्री असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कापला गेल्याची देखील चर्चा आहे.




विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक 21 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नाव घोषित झाली आहेत. तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसकडून अद्याप कुठल्याही उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाही.

निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.

विधानसभेत 288 आमदार आहेत. विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून जायला 29 मतांचा कोटा आहे. आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपच्या तीन जागा जवळपास निश्चित आहेत. नवव्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे 170 मतं आहेत. सहा जागांसाठी त्यांना 174 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे 105 स्वत:ची तर 6 ते 7 मित्रपक्षांची मतं असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 3 जागा निश्चित असल्या तरी नववी जागा कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

विधानसभेच्या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 169 मतं मिळाली होती. 169 विरुद्ध 0 असं बहुमत सिद्ध झालं होतं. मात्र विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे. तसेच स्वत: मुख्यमंत्री मैदानात असल्यानं हा सामना रंगतदार असणार आहे.

दुसरीकडे कोरोनासारख्या काळात ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा देखील आहे. महाविकासआघाडीने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक नक्कीच रंगतदार होईल. पण मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असताना हा धोका आघाडी पत्करण्याची शक्यता नाही व निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करावी लागणार 

राजपाल नियुक्त सदस्यांना (affidavit) प्रतिज्ञापत्र सादर करावं लागत नाही कारण हे सदस्य नामनियुक्त असतात. राज्यपाल त्यांची थेट नेमणूक करतात. त्यांना कुठल्याही निवडणुकीला सामोरं जावं लागतं नसल्याने निवडणूक आयोगाचे मॅन्युअल त्यांना लागू होत नाही. पण आता रिक्त जागेवरुन निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना (affidavit) सादर करावं लागेल. यामुळे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.

विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र