मुंबई : भाजप आमच्या आमदारांवर दबाव आणत असून त्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या संदर्भात आमच्या आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना आमदारालाही ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला आहे.


राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच आता आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आमच्या इगतपुरीच्या आमदारांना भाजपकडून फोन आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आमचे आमदार फुटणार नाही
जे फुटणारे होते ते आधीच गेल्यामुळे आमचे आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून काँग्रेसच्या आमदारांना फोन टॅप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवण्यात आल्याच्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, की असे काही करण्यात आलेले नाही. जे आमदार गेले असतील ते पर्यटनासाठी गेले आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही भाजपवर आरोप
नाशिकमधील काँग्रेसच्या आमदाराला २० कोटी रुपयांची ऑफर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आम्हाला आणखी कोणीही संपर्क केलेला नाही. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे ते कुठेही जाणार नसल्याचा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मोदी-शाहांचा डाव असल्याचंही ते म्हणाले तर, फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळेच भाजपला जनतेने धडा शिकवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी एबीपी माझाने काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना संपर्क केला असता, कोणचाही फोन आला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मध्यस्थीसाठी त्यांना कार्यकर्ते भेटायला आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

...मग शिवसेना राम जन्मभूमी आणि सावरकरांबद्दलची भूमिका सोडणार का? - चंद्रकांत पाटील