मुंबई : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सकाळी पावणे दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रपती राजवटीच्याआड महाराष्ट्राला छळू नका, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत. राऊतांच्या या गंभीर आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढतच चालला आहे. परिणामी फक्त काही तास उरले असताना सत्तेचा तिढा कसा सुटणार हा प्रश्न आहे.


शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर ठाम असल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच त्यांनी मातोश्रीवर यावं, असं राऊतांनी नमूद केलं. शिवाय, पैसा आणि सत्तेचा वापर करुन कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो, असा आरोपही राऊतांनी केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा घणाघात राऊतांनी केला.

कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न
आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर काँग्रेस आमदारांनाही अज्ञात स्थळी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविषयी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पैसा आणि सत्तेद्वारे कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होण्याची भीती वाटत असेल तर ते लोकशाहीचं, पंतप्रधानांच्या स्वच्छ कारभाराच्या स्वप्नाला महाराष्ट्राने दिलेलं आव्हान आहे. पडद्याच्या मागे काय होत आहे. कर्नाटक पॅटन राबवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना. पण महाराष्ट्रात हा प्रयत्न होणार नाही.

कर्नाटकमध्ये काय घडलं होतं?
2018 मध्ये झालेल्या कर्नाटक निवडणुकीत 104 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला खरा. परंतु जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. पण हे सरकार काही महिनेच टिकलं. कर्नाटकात घोडेबाजाराला ऊत आला. भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडलं आणि त्यांना मुंबईत ठेवलं होतं. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून भाजपने कर्नाटक काबीज केलं. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झालं. आता हाच पॅटर्न महाराष्ट्रातही पाहायला नको मिळायला म्हणून शिवसेना अलर्ट झाली आहे.

..म्हणून शिवसेना आमदार हॉटेलमध्ये!
शिवसेना आमदारांना सध्या मुंबईतील रंगशारदामध्ये ठेवण्यात आलं आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "कोणताही निर्णय घेताना सगळे आमदार एकत्र असावेत म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तसंच काही नवीन आमदारांना अद्याप आमदार निवास मिळालेलं नाही. राहायची व्यवस्था नाही, त्यामुळे ते हॉटेलमध्ये एकत्र राहतील."

राष्ट्रपती राजवट हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान
"हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करेल. 105 आमदार असून तुम्ही सरकार बनवत नाही. पण राष्ट्रपती राजवटीच्या आडून महाराष्ट्रावर राज्य करणार, हे चुकीचं आहे. संविधानाच्या विरोधात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा अपमान आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवटीच्या उत्तरावर दिली.