सातारा : जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळख असणा-या साता-यातील पुस्तकाचं गाव ही भिलारची ओळख आता पुसली जाणार आहे. अनाठायी खर्च होतो म्हणून हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय राज्याच्या प्रधान सचिवांनी घेतला आहे. तर पुस्तकाचं गाव बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


इंग्लंडमधील 'हे ऑन वे' या गावाच्या धर्तीवर पाचगणी जवळचं भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून पुढे आलं. 1 मे 2017 ला तत्कालिन मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प सुरु करण्यात आला. या निर्णयामुळं भिलारचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावाला विचारात न घेता घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळं भिलारवासीय रस्त्यावर उतरणार आहेत.

तावडे म्हणाले, मराठी भाषा विभागाच्या पूर्वीच्या सचिवांनी भिलार येथील पुस्तकाचे गाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण या खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आढावा घेतला. त्यांच्याशी याबाबत बोलणं झालं.पुस्तकाचे गाव अजिबात बंद होणार नाही असं मंत्र्यांनी स्वतः मला आश्वस्त केलं. उलट त्या गावात MIDC मार्फत एक अँम्फी थिएटर त्यांनी बांधून दिलं आहे. अजून काही सुधारणा करणार असल्याचा विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हा कमी पैशात झालेला मोठा प्रकल्प आहे. याला खूप जास्त अनुदानाची गरज नाही.

काही अधिकारी आणि प्रधान सचिव गावात आले होते. या पुस्तकाच्या गावालाच नव्हे तर इतर विभावरही अनाठाई खर्च केला जात असल्याचा आरोपही या दौ-यात प्रधान सचिवांनी केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.अधिकारी आले तेव्हा ते नकारात्मक दिसत होते. मात्र या बाबत आम्हाला लेखी असे कोणतेच आदेश दिले नसल्याचं या विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक सांगत असले तरी पुस्तकाच्या गावातील पाच कंत्राटी कर्मचारी तसेच इतरही विभागातील कर्मचारी सक्तीच्या रजेवर घरी पाठवले आहेत.

स्पेशल रिपोर्ट : साताऱ्यातील भिलार... पुस्तकं आणि स्ट्रॉबेरीच्या थीमवर सजलेलं गाव



पुस्तकाचं गाव ही संकल्पना राबवण्यास ग्रामपंचायत स्वबळावर जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे का असा सवाल गट विकास अधिकाऱ्यांनी भिलार ग्रामपंचायतीला पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आगे. त्यामुळं पुस्तकाचं गाव ही संकल्पना राबवण्यासाठी सरकार उदासीन आहे का या अनुषंगाच्या चर्चा गावात सुरु आहेत. दरम्यान पुस्तकाचं गाव ही संकल्पना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. तसंच पुस्तकाच्या गावा बाबत अधिक माहिती घेण्य बाबत  अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत.

आता जर हा प्रकल्प बंद झाला तर नावारुपाला आलेल्या या प्रकल्पाबाबत सध्याच्या सरकारची भुमिका काय राहणार? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांच्याकडून या प्रकल्पाला दहा लाख रुपयांची पुस्तक देण्यात आली आहे. शिवाय रयत शिक्षण संस्थेकडूनही 75 हजाराची पुस्तक त्यांनी पाठवली. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते या वाचन संस्कृतीचे धडे देणा-या या गावाला या संकटातून वाचवतील यात शंका नाही.