Rahul Gandhi Bharat Jodo:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) राज्यातील आजचा शेवटचा दिवस. आज राज्यातील यात्रेचे शेवटचे क्षण त्यांनी बुलढाण्यातील निमखेडमध्ये केला.  भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले.


बुलढाणा जिल्ह्यातील आजच्या शेवटच्या सभेनं महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची सांगता निमखेड येथे झाली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या पदयात्रेदरम्यान महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, महिला, दलित, वंचित विविध समाज  घटकांचे लोक भेटले, त्यांनी त्यांच्या समस्या, वेदना, व्यथा सांगितल्या. देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीसंदर्भातही लोक बोलले, विविध संघटना, संस्थांचे प्रतिनिधी, विचारवंत भेटले , त्यांनी दिलेली माहिती माझ्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्राकडून मिळालेला हा अनुभव मी कधीच विसरणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 


भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निमखेड येथे LIGHT OF UNITY चा भव्य सुंदर लाईट शो आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वधर्मसमभावाचे दर्शन याव लाईट शो मधून दाखवण्यात आले.


भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील चौदाव्या व शेवटच्या दिवशी पदयात्रा सकाळी भेंडवळ येथून सुरू झाली आणि दहा वाजता जळगाव (जामोद) येथे पोहोचली. संध्याकाळी यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गेली. आजचा मुक्काम निमखेडी येथे असून पुढे ही यात्रा बुऱ्हाणपूर या मध्य प्रदेशातील शहराच्या वेशीवर दाखल होईल.



राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका


राहुल गांधी आज दुपारी आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात बोलताना म्हणाले की, आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजप करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले.  आज दुपारी जळगाव जामोद मध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच आहेत.


ही बातमी देखील वाचा 


Bharat Jodo: आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, राज्यात 14 दिवस असलेल्या यात्रेत महत्वाचं काय काय घडलं..