बीड: जिल्ह्यातील बीड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना म्हणजे राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना. मात्र हा साखर कारखाना मागच्या आठ वर्षापासून बंद आहे. काही दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना लवकर सुरू करावा अशी मागणी केली होती.


सन 2014 पासून राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना कारखाना बंद आहे. यामुळे येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे संबंधित नेत्यांनी म्हणावे असे लक्ष आज पर्यंत दिलेले नव्हते. कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे बँकेनेच कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये बीड जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असला तरी त्यापूर्वी मात्र पाण्यासाठी बीडच्या शेतकऱ्याने मोठा संघर्ष केल्याचे आपण पाहिले होते. आता पाण्याचे सोर्स वाढले आहेत आणि पाऊस सुद्धा नियमित पडतोय त्यामुळे उसाची लागवड बीड तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच जर राजुरीचा गजानन सहकारी साखर कारखाना सुरू झाला तर इथले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकेल.


गजानन सहकारी साखर कारखान्याकडे एकूण 90 कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि हा कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहिला मिळतोय. याच कर्जातून मुक्ती व्हावी आणि साखर कारखाना परत चालू व्हावा म्हणून आता भाडेतत्वावर हा साखर कारखाना देण्यासंदर्भात हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे.


काहीही करा पण गजानन साखर कारखाना चालू करा: संदीप क्षीरसागर
मागच्या आठवड्यामध्ये बीड शहरात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना संदीप क्षीरसागर यांनी गजानन सहकारी साखर कारखाना चालू करण्याची इच्छा देखील लोकांसमोर व्यक्त केली. कारण हा साखर कारखाना उभारताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. आता बंद पडलेला कारखाना बघितल्यावर मला खूप वाईट वाटतं, कारखाना चालू होता तेव्हा त्याच्यामध्ये नवीन मशिनरी जयदत्त क्षीरसागर यांना लावता आल्या नाहीत आणि त्यांनी कारखाना बंद पाडला. कारखाना चालू व्हावा ही माझ्या वडिलांची इच्छा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मी कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले होते.


संबंधित बातम्या :