सोलापूर : मराठी भाषेवरून सलग दुसऱ्या दिवशीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिमटे काढले आहेत. इंग्रजी वापर करायला हरकत नाही मात्र स्थानिक भाषांचा वापर होणं गरजेचं असून राज्यात मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहीजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाचा 15 व्या दीक्षांत सोहळा पार पडला. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. काल (गुरुवारी) सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ही राज्यपालांनी मराठीवरून टोला लगावला होता. क्रिडा स्पर्धेच्या कार्यक्रमात सुत्रसंचालन संस्कृतमधून करण्यात आले. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरुंचे कौतुक केले. संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे. अशात संस्कृतमधून सुत्रसंचालन केल्याचे समाधान कोश्यारी यांनी व्यक्त केलं. तर उपस्थित पाहुण्यापैकी कोणीच मराठीत भाषण केलं नाही यावरुन राज्यपालांनी कानपिचक्या काढल्या होत्या. कार्यक्रमात कोणीच मराठीत भाषण केलं नाही. कुलगुरुंनी ही इंग्रजीत भाषण केलं. किमान आभार तरी मराठीत मानावे, असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिमटे काढले होते.

आज ही राज्यपालांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगा, असे वक्तव्य केले आहे. बंगालमध्ये गेल्यानंतर एक दोन वाक्य जरी बंगाली भाषेत बोललं, तर बंगाली लोक खूश होतात. मी जरी उत्तराखंड मधून आलो असलो तरी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी यायलाच हवी. असे वक्तव्य राज्यपाल कोशारी यांनी केले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पदवी स्वीकारण्याचा क्षण खूप आनंददायी असतो. पदवी घेणे म्हणजे शिक्षणाचा अंत नसून यापुढे मोठ्या जोमाने सार्वजनिक आयुष्यात काम करावे असा आशावाद राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत सोहळा विद्यापीठ प्रांगणात पार पडला. जवळपास 80 विद्यार्थ्यांना पीएचडी, 54 विद्यार्थ्यांना विविध विषयातील सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले तर 11 हजार 427 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

संबंधित बातम्या : 

भारतीय भाषणात पुढे मात्र क्रीडाप्रकारात मागे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची खंत